अहमदनगर : येथील शहर विकास समितीने कोरोना नैसर्गिक आपत्ती काळातील घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी, या मागणीसाठी सुरू केलेल्या सह्यांच्या मोहिमेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
महापालिकेच्या १२ ऑगस्ट रोजीच्या विशेष सर्वसाधारण सभेत तीनपट घरपट्टी वाढीचा विषय खर्चासह मंजुरीसाठी ठेवला होता. शहर विकास समितीने तीनपट घरपट्टी वाढीविरोधात आंदोलन केेले होते. नागरिकांच्या कलम १३३-अ या हक्कासाठी मनपा पदाधिकारी आणि नगरसेवकांना मागणीपत्र दिले जात आहेत. शहर विकास समितीबरोबरच भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, चितळेरोड हॉकर्स युनियन, सिटू, ऑल इंडिया युथ फेडरेशन, पीस फौंडेशन, ऊर्जिता सोशल फौंडेशन, रहेमत सुलतान फौंडेशन, आयटक, आम आदमी पार्टी, इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशन, छावा, शिवराष्ट्र सेना या समविचारी पक्ष, संघटनांनी महापौरांना मागणीपत्र दिले आहेत. शहरात याबाबत विविध माध्यमांमधून जनजागृती केली जात आहे. विविध भागात कायद्याच्या माहितीची पत्रके वाटणे, नागरिकांच्या प्रभाग बैठका घेऊन कायद्याचा प्रसार व हक्काचे प्रबोधन करणे, आदी मोहीम सुरू आहे.