अहमदनगर : शहरात वेळी अवेळी सुरू असलेले भारनियमन दोन दिवसांत थांबवा अन्यथा अधिकार्यांच्या तोेंडाला काळे फासू आणि त्यांना त्यांच्याच कार्यालयात कोंडून घेऊ असा इशारा शिवसेनेचे आ. अनिल राठोड यांनी दिला. भारनियमन प्रश्नी काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी राठोड बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर शहरातील भारनियमन प्रश्नी शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अनिल शिंदे, विक्रम राठोड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सुरूवातीला मोर्चेकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राठोड म्हणाले की, दिवसभर शहरात वीज गायब असते. सोबत रात्रीच्या वेळी अतिरिक्त अथवा तातडीच्या भारनियमनाच्या नावाखाली वीज पुरवठा बंद करण्यात येतो. यामुळे अबालवृध्दांसोबत आजारी माणसांचे मोठे हाल होतात. एकीकडे प्रामाणिकपणे काही वीज ग्राहक बिल भरतात. त्यांना बिल न भरणार्यांच्या पंक्तीत बसविण्यात येत आहे. हा प्रकार चुकीचा आहे. भारनियमन प्रश्नावर उत्तर देण्यासाठी सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने महावितरण कडून पाठविण्यात आलेल्या दुय्यम अधिकार्यांसोबत चर्चा करण्यास राठोड यांनी नकार दिला. तसेच दोन दिवसांत हा प्रश्न मार्गी न लागल्यास अधिकार्यांना काळे फासण्याचा इशारा दिला. यावेळी कदम यांचेही भाषण झाले. यावेळी सुषमा पडोळे, निर्मला धुपधरे आणि महापालिकेतील पक्षाच्या नगरसेविका उपस्थित होत्या. (प्रतिनिधी) यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी तातडीने महावितरणच्या अधिकार्यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, राठोड यांनी अधीक्षक अभियंता यांच्यासोबत बैठक घेण्याचा आग्रह धरला. आज शनिवारी ही बैठक होणे अपेक्षित आहे. नगर शहरात कोणत्याही भागात, कोणत्याही वेळी वीज गायब झाल्यास मला फोन करा, असे आवाहन राठोड यांनी यावेळी केले. मोर्चा दुपारी १२ वाजता निघाला होता. यावेळी गर्दी कमी असल्याचे जाणवले.
भारनियमनाचा भडका रस्त्यावर
By admin | Updated: May 24, 2014 00:41 IST