अहमदनगर : नगर एमआयडीसीतील विकासाचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्याचे जिल्ह्यातील आमदार, मंत्र्यांनी मनावर घेतलेले आहे, हे महिनाभरात उद्योजकांसोबत झालेल्या बैठकांवरून दिसून आले आहे. नगरच्या उद्योगाबाबत प्रथमच एवढ्या वेगवान घडामोडी घडत आहेत. शासन दरबारी पाठपुरावा झाल्यास महाविकास आघाडीकडून नगरच्या एमआयडीसीसाठी हा एकप्रकारे बूस्टर डोस ठरणार आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात साखर कारखान्यांचे मोठे जाळे आहे. यातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला. तसा प्रयत्न इतर उद्योग आणण्यासाठी यापूर्वी झाला नाही. नगरची औद्योगिक वसाहत आजही मोठ्या कंपन्यांच्या प्रतीक्षेत आहे. मोठ्या कंपन्या सहजासहजी येत नाहीत. त्यासाठी पोषक वातावरण तयार करावे लागते; परंतु हे सर्व करणार कोण, पुढाकार कुणी घ्यायचा? आणि घेतलाच तर इतर नेते पाठिंबा देतील का? ही नगरच्या एमआयडीसीसमोरील सर्वांत मोठी समस्या आहे. नगरचा औद्योगिक विकास करणार, हा विषय आजवर केवळ निवडणुकांच्या जाहीरनाम्यापुरता मर्यादित राहिला. महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी पुढाकार घेतल्याने किमान एमआयडीसीतील प्रश्नांवर आज चर्चा तरी होऊ लागली आहे. सध्या कोणत्याही निवडणुका नसताना एमआयडीसीच्या प्रश्नावर चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ असावी. यानिमत्ताने फायलींवरील धूळ झटकली गेल्याने नगरकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. महाविकास आघाडीकडूनही जिल्ह्यातील तरुणाईला मोठी अपेक्षा आहे. त्या पूर्ण करण्यासाठी आमदार, मंत्र्यांनी बैठकांच्या माध्यमातून पुढाकार तर घेतला आहे; परंतु त्यासाठी पाठपुरावाही तितकाच महत्त्वाचा आहे. तसे झाले तरच नगरच्या उद्योगाला गती मिळेल. उद्योग वाढीसाठी अपेक्षित असलेली राजकीय इच्छाशक्ती यानिमित्ताने लाभली आहे; पण त्यात सातत्य राहिले तरच इथे नवीन कंपन्या येण्यास तयार होतील. तरुणाईच्या हाताला रोजगार मिळेल. पुणे, मुंबईची वाट त्यांना धरावी लागणार नाही.
...
आमदार, मंत्र्यांच्या बैठकांनी आशा पल्लवित
शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी नागापूर एमआयडीसीतील बंद पडलेला आयटी पार्क सुरू केला. नवीन आयटी कंपन्या आणण्याचे आवाहनही त्यांनी इतर राजकीय पक्षांना खुल्या दिलाने केले. राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत येथील उद्योजकांसोबत बैठक घेतली. त्यापूर्वी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही उद्योजकांची बैठक घेतली. त्यानंतर मुंबईत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत उद्योजकांची बैठक झाली. त्यानंतर जलसपंदामंत्री शंकरराव गडाख यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत सोनई येथे नगरच्या उद्योजकांची बैठक घेतली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नगरच्या उद्योगाबाबत प्रथमच बैठका झाल्या. त्यामुळे उद्योजकांसह जिल्हावासीयांच्याही अपेक्षा वाढल्या असून, आमदार, मंत्र्यांची जबाबदारी वाढली आहे.