अकोले : तालुक्यात ५२ ग्रामपंचायतींची निवडणूक रणधुमाळी सुरू असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवार ते रविवार तीन दिवस सलग सुट्या असून, ३० डिसेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. ५२ गावांतील ४६६ ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार आहेत. दुपारी धुमाळवाडी येथील विक्रम घोलप यांनी पहिला उमेदवारी अर्ज दाखल करीत अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा श्रीगणेशा केला.
धुमाळवाडीसह टाकळी, वाशेरे, लहित बुद्रुक, ब्राह्मणवाडा, कोतूळ, निंब्रळ या गावांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गेल्या ६० वर्षांत तालुक्यातील मोग्रस ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीची लढत झाली नाही. सतत बिनविरोध निवडणूक पार पडते. ही परंपरा यंदाही कायम राहण्याची दाट शक्यता आहे. तालुक्यातील म्हाळदेवी, बोरी, वाघापूर, उंचखडक खुर्द, कळस खुर्द व मोग्रस या सहा गावांत यंदा बिनविरोध निवडणूक होण्याचे संकेत मिळत आहेत.
तालुक्यात राजकीय पक्षांपेक्षा स्थनिक पुढारी व आजी माजी आमदार यांच्या गटांमध्ये गावोगावी लढती रंगण्याची चिन्हे गडद आहेत.
आमदार डॉ. किरण लहामटे यांनी निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावांसाठी २६ लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली असून, किती ग्रामपंचायत बिनविरोध होतात? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादीसह तालुक्यातील महाविकास आघाडी आणि भाजपा, अशी लढत होणार असली तरी सध्या गावोगावी बिनविरोधसाठी ग्रामस्थांच्या सभा व बैठका होऊ लागल्या आहेत. अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या शेतमळ्यात ‘लेट नाइट’ बैठका झडू लागल्या आहेत.
मंगळवारी भाजपा व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तालुक्यातील काँग्रेसची स्थिती मजबूत होताना दिसत आहे. यामुळे तालुक्यातील नवलेवाडी, कुंभेफळ, देवठाण, सावरगावपाट, रुंभोडी, अशा ग्रामपंचायतींमध्ये चमत्कार घडू शकतो ?
........
कानमंत्र काय जादू करणार
बुधवारी आमदार डॉ. लहामटे, शेतकरी नेते दशरथ सावंत, ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, बी.जे. देशमुख, सुरेश गडाख, भानुदास तिकांडे, विनय सावंत यांच्या शिष्टमंडळाने बारामती येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. तालुक्यातील विकासकामांसह भविष्यातील ग्रामपंचायत व सहकाराच्या निवडणुकासंदर्भाने चर्चा केल्याचे समजते.
राजूर, कोतूळ, ब्राह्मणवाडा, गणोरे, देवठाण या मोठ्या गावांत थंडीच्या मोसमात निवडणुकीचे रण चांगलेच तापले आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांच्या अकोलेतील सभेने निर्णायक दिशा दिली. बुधवारी आमदार लहामटे यांच्या शिष्टमंडळास पवार यांनी निवडणुकांच्या तोंडावर दिलेला कानमंत्र काय जादू करतो? याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.