अकोले : आधुनिक तंत्रज्ञान, संकरित बियाणे ही शेतीमध्ये काळाची गरज बनली आहे. पीक पद्धतीत झालेल्या बदलाने तालुक्यातील खरीप हंगामातील बाजरीचे क्षेत्र कमालीच घटत चालले आहे. त्यामुळे भविष्यात अकोले तालुक्यात बाजरी पीक इतिहास जमा होण्याची भीती निर्माण झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून बाजरीच्या रानात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. उसाच्या अगोदर तालुक्यात जवळपास १५ ते १६ हजार हेक्टरवर खरीप हंगामात बाजरी पीक घेतले जायचे. यंदा तालुक्यात केवळ सातशे हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली आहे. किमतीत वाढ न झाल्याने बाजरी पीक परवडत नाही. दुसरीकडे तेलाच्या किमती गगनाला भिडल्याने सोयाबीनचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. यंदा सोयाबीनचे क्षेत्र पाच हजार हेक्टरच्या जवळपास गेले आहे.
एखाद्या शेतकऱ्याने बागायती क्षेत्रात बाजरी पेरली तर पाखरे ती टिकू देत नाहीत. परिणामी तालुक्यातील पूर्व भागातील बागायती क्षेत्रात बाजरी पीक शिवारात दिसेनासे झाले आहे.
विदर्भ मराठवाड्यात वातावरणानुसार ज्वारी प्रामुख्याने असायची. जीवनशैली बदलल्याने पीक पद्धती बदलली. आहारात तेलाचे प्रमाण वाढून चमचमीतपणा आला. फास्ट फूडच्या जमान्यात सकस आहारातील तृणधान व कडधान्ये मागे पडली. पूर्वी हंगामानुसार सात्त्विक आहार घेतला जात असे. श्रावणात आहारात प्रामुख्याने पालेभाज्या असायचा. आषाढात कष्टाच्या कामाच्या वेळी मांसाहार, तर उन्हाळ्यात ज्वारी, भात असे हलकेच अन्न असायचे.
...............
बदलती जीवनशैली, आहारात आलेले फास्ट फूड, रासायनिक खते, कीटकनाशक फवारणीतून तयार होणारे अन्नधान्य, भाजीपाल्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. पुढील धोका लक्षात घेऊन पुन्हा पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे वळावे लागेल.
- डाॅ. अभिजित दत्तात्रय फापाळे, लिंगदेव.
.................
एकेकाळी खरीप हंगामातले मुख्य पीक असलेल्या बाजरी पिकाने यंदा माझ्या गावचा शिवार सोडला आहे. शेतकऱ्यांना हे पीक परवडत नाही. बाजरीची जागा सोयाबीनने घेतली. कोणी बाजरी पेरली तर पाखरे पीक खाऊन टाकतात. तालुक्यातल्या प्रवरा परिसरातल्या गावांत बाजरीचे शेत शोधावे लागते. पीक पद्धती बदलल्याने बाजरी हद्दपार झाली आहे.
- भाऊसाहेब सखाराम चासकर, बहिरवाडी
.................
पेरणीसाठी ट्रक्टर अन् निंदणीसाठी तणनाशक
पूर्वी नांगरणी, वखरणी, पेरणी, कोळपणी, निंदणी, गोफणगुंडा घेऊन राखण, कापणी, वाहणी, खळ्यावर सुडी, मग हिवाळ्यात मोडणी, मळणी अन् मग बाजरीची रास तयार व्हायची. शेतकरी कणगीत धान्य साठवून ठेवत. बहुतेक कामात इर्जिक असे.
आता बाजरी पेरली तर ट्रॅक्टरने, निंदणी टाळण्यासाठी तणनाशक, कणसे कापून लगेच मळणी यंत्रात, धान्य लगेच बाजारात विक्रीसाठी जाते.