अहमदनगर : वैदू समाजाने जातपंचायत बंद करण्याची भूमिका जाहीर केली असताना समाजातील काही पंच मढी येथील यात्रेत बुधवारी पंचायतीचा नारळ फोडण्याच्या प्रयत्नात आहेत. जात पंचायतीच्या विरोधात लढणाऱ्या तरुणांनाच समाजातून बहिष्कृत करण्याचा इशारा या पंचांनी दिला आहे. वैदू समाज हा भटक्या जमातींपैकी एक असून कष्टकरी समाज आहे. या समाजाची मढी येथील प्रसिद्ध यात्रेत मोठी जातपंचायत भरत होती. गतवर्षी १५ मार्चला वैदू समाजाचे प्रदेशाध्यक्ष शामलिंग शिंदे यांच्यासह समाजाच्या प्रमुख पंचांनी वैदू समाज जात पंचायत बरखास्त करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले. मात्र, नगरच्या काही पंचांनी मढी येथे यावर्षी जात पंचायत भरविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. जात पंचायत विरोधात प्रबोधन करणारे महाराष्ट्र वैदू समाज संघटनेचे अध्यक्ष नागेश शिंदे आणि उपाध्यक्ष संजय धनगर यांना समाजातून बहिष्कृत करण्याच्या धमक्या या पंचांनी दिल्या आहेत. मात्र, मढीत जातपंचायत भरल्यास त्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिंदे आणि धनगर यांनी दिला आहे. पंचांच्या भूमिकेमुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
वैदू समाजाची जातपंचायत भरविण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2016 23:40 IST