पारनेर : उपोषण स्थगित केल्यानंतर शनिवारी (दि.३०) ‘सामना’च्या अग्रलेखातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भूमिकेवरच टीका करण्यात आली. त्यामुळे अण्णा भडकले असून, तुमच्या पक्षाचा मंत्री घरी पाठविला होता ते विसरले का? असा सवाल त्यांनी केला. आम्ही कोणत्याही पक्षाचे नाहीत. आम्ही समाज आणि देशाला प्राधान्य देतो, असेही स्पष्टीकरण अण्णांनी दिले.
स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबाजवणीसह शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी अण्णा हजारे यांनी ३० जानेवारीला उपोषण सुरू करणार, असे जाहीर केले होते. अण्णांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी शुक्रवारी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन आदींनी राळेगण सिद्धी येथे त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यातून एक उच्चस्तरीय समिती नेमून सहा महिन्यांत कृषीच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा निर्णय झाला आणि अण्णांनी उपोषण स्थगित केले. ‘सामना’च्या शनिवारच्या अग्रलेखात अण्णांच्या भूमिकेवर टीका करण्यात आला आहे.
अण्णांनी कृषी कायद्याबाबतही काही तरी भूमिका घ्यायला हवी. तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत. त्या शेतकऱ्यांवर सरकार पक्षाचे आमदार, स्थानिक समर्थक हल्ला करत आहेत. याकडे अण्णांनी लक्ष देणे गरजेचे आहे. राळेगणमध्ये बसून भाजपच्या पुढाऱ्यांबरोबर सोंगट्या खेळत बसण्यात काहीच हाशील नाही. अण्णांनी मैदानात उतरायला हवे. लोकशाही, शेतकऱ्यांचा स्वाभिमान यासाठी अण्णांना भूमिका घ्यावीच लागेल. राळेगणात बसून भाजपच्या पुढाऱ्यांसोबत प्रस्ताव, चर्चेच्या फेऱ्या करून काय उपयोग? त्यांनी आधी उपोषण जाहीर केले आणि केंद्र सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेऊन स्थगित केले. हे सगळे ठीक आहे, पण शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करणाऱ्या कृषी कायद्याबाबत अण्णांनी भूमिका घेणे गरजेचे आहे, अशी टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली.
या टीकेला उत्तर देताना अण्णा म्हणाले, तुमच्या पक्षाचा मंत्री घरी गेला होता, ते विसरलात का? भ्रष्टाचार केलेल्याला तुम्ही पाठिशी घातला. आम्ही आंदोलन केले आणि तुमचा मंत्री घरी गेला. आमच्यासमोर कोणताही पक्ष नाही. मी आतापर्यंत २० वेळा उपोषणे केली. इतर आंदोलनही अनेक केली. आताचे भाजपचे सरकार आल्यापासून सहा आंदोलने केली आहेत. माझ्या आंदोलनाने जे सहा मंत्री घरी गेले, त्यात शिवसेना, भाजप, काँग्रेसचेही मंत्री होते, असे स्पष्टीकरण अण्णांनी दिले.