कौठेकमळेश्वर येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह शनिवारी सकाळी सुकेवाडी येथील तरुणाशी करण्यात येणार होता. विवाहासाठी शनिवारचा मुहूर्त ठरविण्यात आला होता. मात्र त्यापूर्वीच संगमनेर तालुका पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत माहिती मिळाली होती. प्रशासनाने तत्काळ हालचाल करीत मुलीच्या आई-वडिलांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून घेतले. त्यांना बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्याची माहिती देण्यात आली. याप्रसंगी उपसरपंच नवनाथ जोंधळे, ग्रामविकास अधिकारी सुरेश मंडलिक, संगमनेर तालुका पंचायत समितीचे सदस्य अशोक सातपुते, रामदास भडांगे, वाल्मीक जोंधळे, तळेगाव पोलीस दूरक्षेत्राचे लक्ष्मण औटी, पोलीस नाईक राजेंद्र पालवे, ओंकार शेंगाळ यांच्या उपस्थितीत मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असा मुलीच्या आई-वडिलांचा तसेच मुलीचा लेखी जबाब नोंदविण्यात आला. पोलीस व प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश आले.
संगमनेर तालुक्यात प्रशासनाने रोखला बालविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:25 IST