श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी बिट्टू ऊर्फ रावजी वायकर आणि संतोष गंगावणे यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
हिरण यांचे १ मार्च रोजी रोजी बेलापूर येथून सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान अपहरण करण्यात आले होते. रविवारी सकाळी एमआयडीसी परिसरात हिरण यांचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील यांनी स्वत: तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मंगळवारी गुन्ह्यात वायकर व गंगावणे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप तपास करत आहेत.
गुन्ह्याची उकल करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. त्यामुळे नगर येथील स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलिसांची चार पथके तपासात गुंतली आहेत. मनोज पाटील हे गेली तीन दिवस येथे ठाण मांडून आहेत.
दरम्यान, या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधिवेशनात निवेदन सादर करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तपासाविषयी कोणतीही माहिती अद्याप सार्वजनिक केली नाही. मात्र, असे असले तरी मंगळवारी अधिवेशनात यावर चर्चा होऊ शकली नाही.
----------