मिनीमंत्रालय : पहिल्याच टर्ममध्ये आमदारकीचे डोहाळेसुरेंद्र राऊत - यवतमाळजिल्हा परिषदेत येताच सदस्यामध्ये विधानसभा लढविण्याची खुमखुमी येते. जिल्हा परिषदेत शड्डू ठोकून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे सदस्य विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यासाठी आसुसलेले आहेत. यामध्ये पहिलीच टर्म असलेल्या सदस्यांचा समावेश आहे. विधानसभेचा मार्ग हा जिल्हा परिषदेतून जातो. मिनीमंत्रालयात अनेक वर्षे सदस्य असलेल्यांची आमदार होण्याची अपेक्षा अजून पूर्ण झालेली नाही. मात्र पहिल्यांदाच सदस्य झालेल्यांना आमदाराकीचे डोहाळे लागले आहे. विधानसभेसाठी आपल्या स्थानिक नेत्यापुढे या सदस्यानी आव्हाण उभे केले आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेला प्रगल्भ नेतृत्वाच वारसा लाभला आहे. जलक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनीसुध्दा जिल्हा परिषदेतूनच राजकीय कारकीर्दीची सुरूवात केली. गेल्या दहा वर्षात केवळ एकाच जिल्हा परिषद सदस्याला आमदार होण्याची संधी मिळाली. काही जेष्ठ सदस्यांनी तर प्रत्येक निवडणुकीत जिल्हा परिषद सर्कल बदलवून संपूर्ण विधानसभा क्षेत्राची परिक्रमा पूर्ण केली. त्यानंतरही या ज्येष्ठ सदस्यांना पक्षाकडून विधानसभेची संधी देण्यात आली नाही. आताही विधानसभेची उमेदवारी घेण्यासाठी नवख्या सदस्यांची धडपड सुरू आहे. या इच्छुकांमध्ये महिला सदस्यांचाही समावेश आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्वच पक्षातील सदस्य विधानसभेवर जाण्यासाठी धडपडत आहेत. आपल्या विद्यमान आमदारांचे तिकीट कापून पक्षाने आपल्याला संधी द्यावी, अशी मनोमन इच्छा या नवख्याकडून व्यक्त केली जात आहे. सर्वाधिक पाच सदस्य हे काँग्रेसचे आहेत. शिवसेनेचे दोन सदस्य, राष्ट्रवादीकडून तीन, अपक्ष एक सदस्य आहे. यात नेता पुत्रांचाही समावेश आहे. याशिवाय जिल्हा परिषदेत माजी पदाधिकारी असलेले विधानसभेसाठी इच्छुक आहे. निवडणूकीसाठी ठेवण्यात येणारा पहिला निकष हा आर्थिक आहे. जातीय समीकरणावर जोर दिला जातो. या दोन्ही अटीची कशी पूर्तता करण्यासाठी आपण कसे, सक्षम आहोत हे पटवून देण्याचा खटाटोप सुरू केला आहे. काहींनी आपल्या आमदाराचा रोष नको म्हणून आपली इच्छा अजुनही सुप्त ठेवली आहे.
जिल्हा परिषदेत शड्डू ठोकणारे विधानसभेच्या आखाड्यात !
By admin | Updated: August 19, 2014 23:58 IST