अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : शिवाजी स्टेडियम, बचत भवनाची दुरवस्था, पाठपुराव्यानंतरही दुर्लक्ष, लोकप्रतिनिधींची अनास्था कारणीभूतमुकेश इंगोले दारव्हाफुटबॉल नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दारव्हा शहरात फुटबॉलसह अन्य खेळाडूंना कोणत्याही प्रकारच्या सुविधा क्रीडा विभागाकडून पुरविल्या जात नसल्याने येथील खेळाडुंना खेळांचा सराव करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याठिकाणी शिवाजी स्टेडीयम व बचत भवन या दोनच जागेवर खेळण्याकरिता पर्याय उपलब्ध आहे. परंतु या दोन्ही जागेंची अतिशय दुरवस्था झाली आहे. यासंदर्भात अनेकदा निवेदने दिली, परंतु कोणत्याही प्रकारच्या सुधारणा होत नसल्याने खेळाडूंमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केल्या जात आहे. दारव्हा शहराला तशी फुटबॉल खेळाची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. ज्वालाक्रांती मित्र मंडळ तसेच अन्य काही संघटनांनी या ठिकाणी बरेचदा अखिल भारतीय फुटबॉल सामन्याचे आयोजन त्यामुळेच या शहराला नवी ओळख मिळाली, परंतु असे असताना खेळाडू आणि त्यांना लागणाऱ्या सुविधा याविषयी लोप्रकतनिधी व अधिकाऱ्यांची अनास्था बघता या बाबीकडे जाणीवपूर्वक तर दुर्लक्ष केल्या जात नाही ना अशी शंका यायला लागली आहे. फुटबॉल, क्रिकेट या सारखे मैदानी खेळ खेळायला शहराच्या मध्यभागी विस्तीर्ण परिसर असलेले शिवाजी स्टेडियम आहे. या स्टेडीयमच्या विकासाकडे पाहिजे तेवढे लक्ष दिल्या जात नाही. स्टेडियमचा विकास करण्याच्या नावाखाली गॅलरी बांधून ठेवल्या परंतु इतर बाबीकडे दुर्लक्ष केल्या गेले. फुटबॉल खेळाडू तयार व्हावे याकरिता सतत प्रयत्न असणारे गणेश भोयर व चैतन्य ग्रुप आॅफ स्पोर्टसच्या वतीने स्टेडियमकरिता अनेक सूचना केल्या आहे. स्टेडियमची साफसफाई, ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजविणे, पाण्याची व्यवस्था करणे, व्यासपीठाची जागा बदलविणे, खेळाडूंकरिता स्वतंत्र चेंजिंग रुम बांधणे कायमस्वरुपी चौकीदाराची नियुक्ती यासह इतरही मागण्या वारंवार केल्या जातात, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्याचबरोबर बॅडमिंटन कोर्ट असणाऱ्या बचत भवनाची तर याही पेक्षा वाईट अवस्था आहे. लाखो रुपये खर्च करून शासनाने याठिकाणी कोर्ट तयार केले. परंतु मेंटेनन्स होत नसल्याने लवकरच बॅडमींटन कोर्ट खराब झाले आहे. या हॉलमध्ये नेहमी अस्वच्छता असते. अनेक प्रकारचे सामान पडून असते, चांगल्या प्रकाराची व्यवस्था नाही, यापूर्वी इन्व्हर्टरची व्यवस्था करण्यात आली होती, परंतु इन्व्हर्टर व बॅटरी तसेच सीएफएल बल्ब गायब करण्यात आले. या हॉलचा खासगी व्यक्ती वापर करीत असतात एक चावी त्यांच्याकडे असते. त्यामुळे बचतभवनाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे येथे बॅडमिंटन खेळणाऱ्या खेळाडुंना त्याचा त्रास सहन करावा लागतो. याबाबत अनेकदा तक्रार करूनही अधिकारी दखल घेत नसल्याचे खेळाडु सांगतात. मनुष्य जीवनात एखादी तरी खेळ खेळला पाहिजे, असे म्हटल्या जाते. शासन त्याकरिता प्रोत्साहन देते, परंतु प्रशासकीयस्तरावर खेळाडूंना सुविधा पुरविल्या जात नसल्याने अनेक जण याकडे वळत नाही. आधीच या शहरात नियमित खेळणाऱ्यांची संख्या कमी आहे. अशीच अनास्था राहिल्यास शिवाजी स्टेडियम बचत भवन शोभेची वस्तू बनून राहील.
दारव्हा येथे क्रीडा सुविधेअभावी खेळाडूंचे हाल
By admin | Updated: September 9, 2015 02:40 IST