वणी : खरिपाची पेरणी तोंडावर आली आहे़ त्यासाठी लागणारी खते व बियाणे खरेदीकरिता पैसा जवळ नसल्याने काबाडकष्ट करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांवर जनावरे विक्री करण्याची वेळ आली आहे़सध्या खरीपाची लगबग सुरू झाली आहे. बळीराजाला मृगाच्या पावसाची प्रतीक्षा आहे. पेरणीसाठी खत, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने त्यातील अनेकांनी आता आपली पाळीव जनावरे विक्रीसाठी काढली आहेत. गुरांच्या बाजारात व्यापाऱ्यांचा बोलबाला असल्याने शेतकऱ्यांना स्वमालकीच्या जनावरांना कवडीमोल भावाने विक्री करण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही़ व्यापारी मागेल त्या किंमतीत जनावरांची विक्री जोरात सुरू आहे़निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी दरवर्षी अडचणीत येतो़ कधी कमी पावसामुळे पीक करपून जाते, तर कधी अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी होते. या दरवर्षीच्या स्थितीमुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडतो़ दरवर्षी होणाऱ्या पिकांची नुकसान भरपाई करण्यासाठी शेतकरी प्रशासनाकडे मागणी करतो. मात्र त्याला तुटपुंजी मदत दिली जाते़ बँकेकडूनही त्यांना अत्यल्प कर्ज दिले जाते़ त्यात त्यांच्या शेतीचा खर्चही भागत नाही़ त्यातच महागाईचा फटकाही सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे़ सोबतच खत, बियाणे यांचे वाढलेले भाव शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसले आहे़ नापिकीमुळे शेतकऱ्यांना कर्जासाठी सावकाराच्या दारात उभे राहावे लागत आहे़ सावकार शेतकऱ्यांना कर्ज देऊन त्यांची वेळ निभावून नेतो. मात्र नंतर व्याजाने शेतकऱ्यांची पुन्हा मान मुरगळली जाते. त्यात जर नापिकी झाली किंवा अतिवृष्टीचा फटका बसला, तर शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही़ त्यातच शेतीपयोगी साहित्य व मजुरी वाढल्याने लहान शेतकऱ्यांची अडचण झाली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांची खरी धनदौलत असलेल्या जनावरांची कवडीमोल भावात विक्री करावी लागत आहे. आता बियाणे व खत घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने ते आपल्या लाडक्या पाळीव जनावरांची विक्री करीत आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)
अल्पभूधारक शेतकरी आले अडचणीत
By admin | Updated: June 18, 2014 00:26 IST