वणी : सध्या सर्वत्र लग्नसराईचे दिवस असल्याने लाल मिरचीची मागणी वाढली आहे. परिणामी दर वाढून आता ही मिरची घेणार्यांच्या नाकाला झोंबू लागली आहे. वणी उपविभागात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. आंध्रप्रदेशातील अनेक शेतकरी या उपविभागात येऊन मिरचीसाठी ठेक्याने शेती करतात. प्रतीएकरप्रमाणे ते येथील स्थानिक शेतकर्यांची शेती कसतात. ही शेती कंत्राट पद्धतीने केली जाते. वर्ष, दोन वर्षांसाठी आंध्रप्रदेशातील शेतकरी ही शेती करतात. गुढीपाडव्यानंतर ते दाखल होतात. आता तर आंध्रप्रदेशातील अनेक शेतकरी वर्षानुवर्षे उपविभागातच वास्तव्याला आले आहेत. त्यांनी आपले कुटुंबही आणले आहे. शेतातच ते राहात असल्याने त्यांना अधिक उत्पादन घेणे सहज शक्य झाले आहे. लग्नसराईमुळे सध्या मिरची खरेदीला जोर आला आहे. यात गुंटूर, संकरित, भिवापुरी, ज्योती आदी अनेक प्रकारच्या मिरचीचा समावेश आहे. रंगाने लाल आणि तिखट असलेल्या मिरचीला जादा मागणी आहे. अशी मिरची आता बाजारात दाखल झाली आहे. चवीन तिखट व रंगाने लाल असलेल्या मिरचीला जादा मागणी असल्याने विक्रेतेही अशा मिरचीची जादा साठवणूक करतात. उन्हाळ्यात लग्नाप्रमाणेच सामान्य ग्राहकही वर्षरासाठी मिरचीची खरेदी करतात. त्यामुळे विक्रेते सध्या चढ्या दराने मिरचीची विक्री करतात. गेल्या काही दिवसांपासून उपविभागात सतत ढगाळ वातावरण, वादळी पाऊस येत असल्याने मात्र मिरची संकटात सापडली आहे. मिरची ओलसर राहात असल्याने खरेदीदार दराने कचरत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी हिरव्या मिरचीला जादा दर मिळत असल्याने हिरव्या मिरचीचा तोडा करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे सध्या बाजारात हिरवी मिरची मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
लाल मिरची झोंबू लागली
By admin | Updated: May 10, 2014 00:34 IST