आयएएस व्हायचयं : सातत्यपूर्ण अभ्यासरूपेश उत्तरवार - यवतमाळआत्याच्या घरी राहून शिक्षण घेणारा जसवंतसिंग तारासिंग पवार हा विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात अव्वल आला आहे. ५०० पैकी ४९१ गुण त्याने मिळविले असून गुणांची टक्केवारी ९८.२० टक्के आहे. सातत्यपूर्ण अभ्यासातून यश मिळविले असून जसवंतसिंगला भविष्यात प्रशासकीय सेवेत जायचे आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील तारासिंग पवार या शेतकऱ्याचा जसवंतसिंग हा मुलगा. आठव्या वर्गापासून तो शिक्षणासाठी यवतमाळ येथील रश्मी दिनेश राठोड या आत्याकडे आहे. येथील लोकनायक बापूजी अणे विद्यालयात तो शिकत आहे. दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत येण्याची पूर्ण खात्री होती. मात्र जिल्ह्यात तो पहिला आला हे यश त्याच्यासाठी अनपेक्षित आहे. दहाव्या वर्गात सुरुवातीपासून त्याने दररोज सात ते आठ तास अभ्यास केला. शिक्षक आणि आत्या व मामाजींच्या मार्गदर्शनात तो अभ्यास करीत होता. स्वामी विवेकानंदांच्या विचाराचा त्याच्यावर पगडा असून स्वामी विवेकानंदांची पुस्तके नेहमी वाचत असतो. दहावीच्या परीक्षेत ५०० पैकी ४९१ गुण मिळाले आहे. संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण तर गणित विषयात ९९ गुण मिळाले आहे. जिल्ह्यात अव्वल आल्याचे माहीत होताच आई-वडिलांसह आत्या आणि मामाजींनी आनंदोत्सव साजरा केला. शाळेतही मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी जसवंतसिंगला पेढा भरवून त्याचे कौतुक केले आहे. एका शेतकरी पूत्राने तेही आत्याकडे राहून शिक्षण घेत मिळविलेल्या या यशाने त्याचे कौतुक होत आहे. जसवंतसिंगला पुढील शिक्षणही यवतमाळातच घ्यायचे आहे. भविष्यात प्रशासकीय सेवेत जायचे असून त्याला आयएएस व्हायचे आहे. यवतमाळ सोबतच मोर्शी येथेही आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मोर्शीच्या राधाकृष्ण कॉलनीत राहणाऱ्या पवार परिवाराने आनंदोत्सव साजरा केला. कुटुंबापासून दूर राहून आत्याच्या घरी शिकून मिळविलेल्या या घवघवीत यशाने पवार आणि राठोड कुटुंब आनंदित झाले आहे. दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या या यशाने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जसवंतसिंग पवार जिल्ह्यात अव्वल
By admin | Updated: June 18, 2014 00:24 IST