यवतमाळ : कपाशी आणि सोयाबीनने दगा दिल्यावर एकमेव आशा असलेल्या तुरीचे दरही ऐन हंगामात घसरले आहे. क्ंिवटल मागे ५०० रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी चांगलेच हादरले असून यामागे व्यापाऱ्यांची नफेखोरी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर तुरीची पेरणी झाली होती. कापूस आणि सोयाबीनमध्ये आंतर पीक म्हणून आठ लाख हेक्टरवर तूर होती. आधीच उशिरा झालेल्या पेरणीने तुरीच्या उत्पादनावर परिणाम झाला. इतकेच नव्हे तर मध्यंतरी आलेल्या पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम झाला. त्यामुळे तुरीचा बहर गळला होता. ओलिताची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला. विविध संकटे झेलत शेतकऱ्यांची तूर काढणीला आली. एकरी एक ते दोन क्ंिवटल उतारा आला. त्यामुळे लावलागवडीचाही खर्च निघणे शक्य नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी आपली तूर बाजारात नेली. सुरुवातीला तुरीचे दर चार हजार रुपये प्रति क्ंिवटलवरून सहा हजार ५०० रुपयापर्यंत वाढत गेले होते. त्यामुळे शेतकरी समाधानी होते. आणखी भाव वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी तूर विकली नाही. मात्र काही दिवसातच ही स्थिती बदलली. गेल्या आठवड्यात तुरीच्या दरात ५०० रुपयांची घसरण झाली. म्हणायला दर ६ हजार रुपये क्ंिवटल असले तरी बहुतांश शेतकऱ्यांना ४ हजार ५०० ते ५ हजार ५०० पर्यंतच दर मिळत आहे. बाजारात तुरीची कुठलीही आवक नाही. तुरीचे चांगले उत्पादन नाही. अशा स्थितीत तुरीचे दर का घसरले हा संशोधनाचा विषय आहे. या घसरणीमागे व्यापाऱ्यांची नफेखोरी असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)
ऐन हंगामात तुरीचे दर घसरल्याने शेतकरी हादरले
By admin | Updated: February 23, 2015 00:09 IST