सचिंद्र प्रताप सिंह : जिल्हा कामगार कृती दल घालणार धाडी, कायद्याची अंमलबजावणीयवतमाळ : वारंवार सुचना देऊन ही एखाद्या दुकानात बाल कामगार आढळत असले, अशा दुकानदारावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहे. बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे, असे असले तरी अजूनही काही ठिकाणी दुकान चालक आपल्या फायद्यासाठी बालकांना राबवून घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. जिल्ह्यात ही प्रथा बंद करण्यासाठी ठिकठिकाणी आस्थापनांवर धाडी घाला. बाल कामगार आढळल्यास संबंधीत दुकानाचा परवाना कायमस्वरूपी निलंबित करण्यात येणार आहे. महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बाल कामगार कृतीदल तसेच जिल्हा वेठबिगार दक्षता समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक अखीलेश सिंग, सरकारी कामगार अधिकार राजु गुल्हाणे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अर्चना इंगोले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात येत्या काळात एकही बाल कामगार दिसता कामा नये, बाल कामगारांचा शोध घेण्यासाठी कामगार विभागाने पोलीस, बालविकास, होमगार्ड आदींच्या सहकार्याने जिल्हाभर धाडसत्र राबविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बाल कामगार ठेवणाऱ्या दुकान, आस्थापना मालकांवर केवळ गुन्हे दाखल करून उपयोग नाही. बाल कामगार ही प्रथा कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी तसेच दुकानचालकांनी बाल कामगार ठेवू नये म्हणून त्यांच्यात प्रशासनाचा धाक निर्माण करण्यासाठी गुन्हे दाखल करण्यासोबतच संबंधीत दुकानाचा परवाना कायमस्वरूपी निलंबित करा, म्हणजे भविष्यात कुणी बाल कामगार ठेवण्याची हिम्मत करू नये, असे जिल्हाधिकारी म्हणाले.बाल कामगार आढळल्यास त्या बालकाचे पुनर्वसन करण्यासाठी धाडीच्या वेळीच कायद्यातील तरतुदीप्रमाणे दुकानचालकाकडून २५ हजार रुपये जमा करून घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. बैठकीतील जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेप्रमाणे जिल्ह्यातील हॉटेल, धाबे, खानावळी, छोटी मोठी दुकाने, आस्थापना, बार, उद्योग कारखान्यांवर भेटी देवून बाल कामगार शोधण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
बालकामगार आढळल्यास फौजदारी गुन्हे
By admin | Updated: June 20, 2015 00:19 IST