स्वच्छ भारत मिशनचा टप्पा एक पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन अंमलबजावणीसाठी हागणदारी मुक्त झालेल्या गावांत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतींना शासनाच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागामार्फत भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायतीला घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी निधी मंजूर झाला आहे. त्यात मालेगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींना २ कोटी १९ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी शिरपूर ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेमार्फत १ कोटी १९ लाख ७ हजार रुपये इतका निधी मंजूर झाला असल्याचे पत्र जिल्हा परिषदेमार्फत शिरपूर ग्रामपंचायतीला प्राप्त झाले आहे. पत्रामध्ये शासन निर्णयाचे तत्काळ अवलोकन करून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी व अंदाजपत्रक सादर करण्याचा सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. या निधीतून शिरपूरमध्ये असलेली सर्वात मोठी सांडपाण्याची समस्या निकाली काढण्यासह घनकचऱ्याचे व्यवस्थापनही होणार आहे. पर्यटन क्षेत्र शिरपूरची मुख्य समस्या असलेल्या सांडपाण्याचे नियोजन या निधीमध्ये होणार असल्याने शिरपूर येथील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
स्वच्छता अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शिरपूरला १.१९ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:24 IST