वर्धा : सतत पाठशिवणीचा खेळ खेळत असलेल्या पावसाचे अखेर शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र पुन्हा जोरदार आगमन झाले. त्यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य फुलले आहे. शेतातील विहिरींची पाणीपातळी वाढण्यासाठी तसेच मुरवता पाणी आवश्यक असल्याचे बोलल्या जात होते. रविवारी झालेल्या पावसामुळे कुठेही अप्रिय घटना घडल्याची नोंद नाही. पाऊस आल्याने पिकांना आधार मिळाला तरी यातून उत्पन्न होईलच याची ग्वाही देता येत नसल्याचे बोलल्या जात आहे.यंदा जिल्ह्यात पाहिजे तशा पावसाची नोंद नव्हती. सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारल्याने याचा विपरित परिणाम पिकांच्या वाढीवर झाला. दुबार तिबार पेरणी करूनही ओलिताची सोय नसलेल्या शेतांमधील पिके करपण्याच्या मार्गावर होती. गत काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पाऊस येईल असे वाटत होते; परंतु चांगला पाऊस कोसळत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता कायम होती. अखेर शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू झाल्याने बळीराजा सुखावला आहे. कपाशीच्या तसेच तूर व सोयाबीनच्या चांगल्या वाढीसाठी चांगल्या पावसाची आवश्यकता होती.(लोकमत न्यूज नेटवर्क)
पावसाची संततधार
By admin | Updated: September 8, 2014 01:29 IST