वर्धा : डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास अद्यापही थंडबस्त्यात आहे. डॉ. दाभोळकर यांची हत्या होवून २० महिने तर पानसरे यांच्या हत्येला दोन महिने लोटले. तरीही तपास कार्याला गती नसल्याने वर्धेतील विविध परिवर्तनवादी व पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने म. गांधी यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने व घोषणा देवून धरणे देण्यात आले. यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भारतीय कॅम्युनिष्ट पक्ष, मार्क्सवादी कॅम्युनिष्ट पक्ष, आयटक आदी पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदनही यावेळी देण्यात आले. डॉ. दाभोळकर यांची २० आॅगस्ट २०१३ रोजी सकाळी ७ वाजता अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. सी.आय.डी., ए.टी.एस., सर्व पोलीस यंत्रणा राबूनसुद्धा हल्लेखोर किंवा सुत्रधाराचा स्द्याप थांबपत्ता नाही. ८ महिन्याआधी सी.बी.आय.कडे तपास सोपवूनही अद्याप तपासाला गती नाही. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच १६ फेब्रुवारी रोजी डॉ. गोविंद पानसरे पत्नीसह फिरत असताना दोघांवरही गोळ्या झाडण्यात आल्या. यात पानसरे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. २० फेब्रुवारी गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला. या घटनेलाही आता दोन महिने झाले. तरीही कुठलाही सुगावा लागलेला नाही. त्यामुळे शासकीय यंत्रणेचा निषेध व खेद व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व निदर्शने करीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी गजेंद्र सुरकार, दिलीप उटाणे, संजय भगत, नरेंद्र कांबळे, सुधीर पांगुळ, मंगेश शेंडे, मयूर राऊत, किशोर देशपांडे, अमीर अजानी, डॉ. सिद्धार्थ बुटले, अॅड. गोडघाटे, अनिल मुरडीव, सुधाकर मिसाळ, विजया पावडे, मैना उईके, वंदना कोळणकर यांच्यासह विविध परिवर्तनवादी व पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)
दाभोळकर व पानसरे यांच्या तपासाला गती द्या
By admin | Updated: April 24, 2015 01:59 IST