चर्चासत्रातील सूर : यशवंत महाविद्यालय व नॅकद्वारे दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रवर्धा : देशात शिक्षणाचे जाळे सर्वत्र पसरले आहे. अनेक विद्यापीठांतून ज्ञानाच्या विविध शाखांमधून शिक्षण दिले जात आहे. नवीन आर्थिक धोरणांमुळे शिक्षण व्यवस्थेला बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशा स्थितीत उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांनी नफ्याच्या गणितापेक्षा राष्ट्रीय विकासाला प्राधान्य द्यावे. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दृष्टीकोनातून कार्य करण्यासाठी शिक्षणाद्वारे प्रवृत्त करावे, असे मत विविध राज्यांतून आलेल्या नॅक तज्ज्ञांनी व्यक्त केले. स्थानिक यशवंत महाविद्यालय व नॅकद्वारे दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आले. यातील तांत्रिक सत्रात नॅक तज्ज्ञांनी उच्च शिक्षण विषयक विचार व्यक्त केले. विषयतज्ञ म्हणून लाभलेल्या पुण्यातील एम.यू. कॉलेज आॅफ कॉमर्सचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. शिरीष चिंधडे यांनी शैक्षणिक अंकेक्षण विषयावर पीपीटीद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाविद्यालयातून जे पदवीधर झाले आहे, त्यांचे मूल्यमापन करावे. त्यांची मदत व सूचना महाविद्यालयाच्या सुधारणेसाठी घ्याव्यात. महाविद्यालयाने सामाजिक जबाबदारी ओळखून विविध उपक्रम राबवावेत. भविष्यातील आव्हांनाचा वेध घेऊन अंतर्गत धोरण ठरवावे, अशा सूचना त्यांनी विविध राज्यातून आलेल्या महाविद्यालयीन प्रतिनिधींना दिल्या. शैक्षणिक अंकेक्षणाबद्दल माहिती दिली. यात विज्ञान, शैक्षणिक, पायाभूत व संसाधन अंकेक्षण आदीवर प्रकाश टाकला. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात गुजरात शासनाच्या उच्च शिक्षण विभागाचे माजी संचालक डॉ. नरेंद्र चोटालिया यांनी गुजरातच्या नेतृत्वाने शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षणासाठी विकसीत राष्ट्रीय संस्थांच्या प्रमाणतेचा तक्ता या विषयाची माहिती दिली. ते म्हणाले, गुजरात शासनाच्या पुढाकारातून नवे शैक्षणिक धोरण आखले गेले. परिणामी, आज गुजरात प्रगतशील राज्य झाले. त्यांनी गुजरात व इतर राज्यांतील शिक्षण पद्धती यांचा आढावा घेतला. गुणवत्ता व संशोधन या बाबींवर विद्यार्थी व प्राध्यापकांना भर देण्यास सांगितले.नागपूरच्या हिस्लॉप महा.चे नॅक समन्वयक डॉ. प्रांतिक बॅनर्जी यांनी शैक्षणिक अंकेक्षणात विद्यार्थ्यांचा सहभाग विषयावर पीपीटीद्वारे मार्गदर्शन केले. विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेचा मुख्य केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन व त्यांची मते शैक्षणिक अंकेक्षणात नोंदविली जावी, ज्यामुळे संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता सुधारता येईल. महाविद्यालयीन आयक्वॅक समितीत विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश करावा, असेही ते म्हणाले. प्राध्यापकांनी पारंपरिक अध्यापन साधनांऐवजी नवनवीन शैक्षणिक संसाधनाचा वापर करावा व विद्यार्थ्यांच्या अभिरूचीला पुरक शैक्षणिक वातावरण तयार करावे, असे सांगितले.(कार्यालय प्रतिनिधी)विविध विषयावरील संशोधनांचे सादरीकरणसंशोधन निबंध वाचन सत्रात यशवंत महाविद्यालय सेलूचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. कृष्णा दीक्षित यांनी ‘भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेत शैक्षणिक अंकेक्षणाचे स्थान’ विषयावर व चंद्रपूर येथील शांताराम पोटदुखे विधी महा.चे नॅक समन्वयक डॉ. पंकज काकडे यांनी ‘शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण, आयक्वॅक आणि विद्यार्थी, परस्पर संबंध’ विषयावर संशोधन निबंध सादर केले. या सत्राचे अध्यक्षस्थान नागपूर येथील विज्ञान संस्थेचे नॅक समन्वयक डॉ. कपील सिंघेल यांनी भुषविले. विषयतज्ञांचा परिचय डॉ. विलास ढोणे यांनी करून दिला. संचालन डॉ. रविशंकर मोर, प्रा. सरिता भारद्वाज, डॉ. कल्पना कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रा. के.बी. चंदनकर यांनी मानले. प्रा. विकास काळे व अजय हेडाऊ यांच्या गायनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थचे अध्यक्ष प्रा. सुरेश देशमुख उपस्थित होते. राष्ट्रीय चर्चासत्राला प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यंनी सहकार्य केले.
नफ्याच्या गणितापेक्षा राष्ट्रीय विकासाला प्राधान्य द्यावे
By admin | Updated: March 1, 2016 01:36 IST