शासनाची सेंद्रीय शेती गाव दत्तक योजनासचिन देवतळे - विरूळ (आ.)सेंद्रिय शेतीकडे शेतकर्यांचा कल वाढविण्यासाठी केंद्र शासनाने ‘सेंद्रीय शेती गाव दत्तक योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंबलबजावणी लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाला देण्यात येणार आहे. शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढल्याने जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. याचे मानवी आरोग्यावर दुष्परिणामही हळूहळू जाणवू लागले आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर जमिनीची सुपिकता कमी होऊन त्याचा थेट उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अलीकडेच राष्ट्रीय मृदसंधारण सर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणात विदर्भातील ४७ टक्के जमिनीचे आरोग्य बिघडले असल्याची बाब समोर आली. शेतकर्यांची सेंद्रीय शेतीची समस्या दूर व्हावी, याकरिता घन कचर्यापासून खत तयार केले जाणार आहे. सेंद्रीय शेतीमधील उत्पादित शेतमालाला बाजारपेठ मिळावी यासाठी देशभर व्यापक स्वरुपात धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी ३0 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. सेंद्रीय शेतीबाबत शेतकर्यांमध्ये जनजागृती करण्याकरिता व्यापक स्वरुपात प्रशिक्षणाचे आयोजन केले जाणार आहे. सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून मातीचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे. ही योजना केंद्र शासन, नाबार्ड, राज्य सरकार यांच्या समन्वयातून राबविली जाणार आहे. याचा १२ व्या पंचवार्षिक योजनेत समावेश करण्यात आला आहे. या संबंधीच्या मार्गदर्शक सूचनाही संबंधित विभागाला प्राप्त झाल्या असल्याची माहिती आहे.
तालुक्यातील एक गाव घेणार दत्तक
By admin | Updated: June 8, 2014 00:05 IST