रत्नागिरी : जयगड आणि संगमेश्वर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची १ कोटी ९६ लाख रुपयांची पाणीपट्टी थकल्याबाबत जोरदार चर्चा झाली. या दोन्ही तालुक्यांतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून तत्काळ माहिती सादर करण्याचा आदेश जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या आज झालेल्या सभेत अध्यक्ष जगदीश राजापकर यांनी दिला. ही सभा जिल्हा परिषद अध्यक्ष राजापकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जयगड आणि संगमेश्वर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची गेल्या अनेक वर्षांपासूनची पाणीपट्टी वसूल करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही पाणीपट्टी थकीत राहिल्याबाबतचा प्रश्न आजच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत सदस्यांनी उपस्थित केला. त्यावेळी संगमेश्वर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची ७५ लाख रुपये आणि जयगड प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची १ कोटी २१ लाख रुपये अशी एकूण १ कोटी ९६ लाख रुपयांची पाणी पट्टी थकीत असल्याचे पुढे आले. ही पाणीपट्टी आजपर्यंत का वसूल करण्यात आली नाही, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. अध्यक्ष राजापकर यांनी थकीत पाणीपट्टीचा विषय गांभिर्याने घेतला आहे. रत्नागिरी व संगमेश्वर पंचायत समित्यांच्या ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाकडून तत्काळ माहिती मागविण्याचा आदेश कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे. रत्नागिरी तालुक्यातील कापडगाव, चिपळूण तालुक्यातील कादवड, तोंडली कळंबटेवाडी व रामपूर जोदगा या पाणी पुरवठा योजनांच्या रिवाईज इस्टीमेंटना आजच्या सभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे लवकरच या येथील हजारो लोकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे अध्यक्ष राजापकर यांनी सांगितले. या सभेला जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)
जयगड, संगमेश्वरची कोट्यवधीची पाणीपट्टी
By admin | Updated: January 10, 2015 00:11 IST