प्रसन्न राणे- सावंतवाडी -तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अद्यापही स्थिरावलेली नाही. रिक्त पदांच्या नावाखाली रुग्णांना दररोज खासगी रुग्णालयात पाठवले जात आहे. वास्तविक येथे आवश्यक ती सर्व यंत्रणा असूनही केवळ प्राथमिक उपचारांवरच रुग्णांना पिटाळले जाते. आजूबाजूच्या तालुक्यांसह सर्वसामान्यांचा मुख्य आधार असतानाही उपजिल्हा रुग्णालयात केवळ मलमपट्टीच्या पलीकडे काहीही केले जात नाही. तालुक्यात मळेवाड, सांगेली, निरवडे, आंबोली, बांदा ही पाच आरोग्य केंद्रे आहेत. दररोज येथे रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे आजही सामान्यांचा आधार बनूनच ही आरोग्य केेंद्रे कार्यरत आहे. पण अलीकडे रिक्त पदांनी ग्रासलेल्या आरोग्य सेवेत अडसर निर्माण झाला आहे. तालुक्यात एकूण आरोग्य विभागात ३६ पदे रिक्त आहेत. यामध्ये या प्राथमिक केंद्रांमध्ये १३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांचा ओढा शहरातील उपजिल्हा रुग्णालयांकडे वाढला आहे; पण तेथेही पर्यायी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची गैरसोय होतेच. उपजिल्हा रुग्णालयालाही अनेक समस्यांनी ग्रासले आहे. येथील मुख्य प्रवेशद्वारातील वीज जोडणीची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्याचे दिवस असूनही याबाबत कोणीच गांभीर्याने घेतले नाही. येथील विजेच्या तारा उघड्यावरच असून, फ्युजसेटही उघड्यावरच आहे. रुग्णालयात मानवी उपचारांसाठी आवश्यक यंत्रसामग्री आहे; पण ती सद्या धूळ खात पडून आहे. केवळ आवश्यक तज्ज्ञ नसल्याने व इतर कोणीही त्यात रस घेत नसल्याने येथील कारभाराचे रहाटगाडगे सुरू आहे. केवळ आपल्यापुरता असा मर्यादित स्वरूपाच्या कारभाराने रुग्णांची विशेषत: गरीब रुग्णांची मोठी परवड होत आहे. याबरोबरच येथील शवागृह मृतावस्थेतच आहे. आंबोलीसह परिसरातील महामार्गावरील अपघातातील मृत अथवा आकस्मित रोगाने मृत झालेल्यांना शवागृहात ठेवण्याची सोय येथे सुरुवातीपासून आहे. कालांतराने पहिले शवागृह नादुरुस्त झाल्याने नवीन शवागृह बांधण्यात आले. पण नव्याचे नऊ दिवसप्रमाणे हेही शवागृह चालले आणि काही दिवसांनी ते बंदही पडले. या विभागातील आवश्यक फ्रिजरमध्ये किरकोळ बिघाड झाला आहे. पण त्याची दुरुस्ती करण्यासाठी कोणाचीच इच्छाशक्ती दिसत नाही. त्यामुळे मृतदेहाप्रमाणे शवागृहाची अवस्थाही मृतच आहे. शवविच्छेदन विभागाची अवस्थाही केवीलवाणी झाली आहे. हा विभाग कित्येक दिवस बंद अवस्थेत असल्याप्रमाणेच आहे. येथे नेमके कधी शवविच्छेदन केले जाते याचा थांगपत्ताच लागत नाही. येथीलही वीज जोडणीची अवस्था बिकट आहे. प्रवेशाद्वारावरीलच विजेची उपकरणे उघड्यावर आहेत. वायरिंंग व स्वीचही धोकादायक अवस्थेत आहे. जर कोणी याला हाथ लावलाच तर जीवघेणा अनुभव पहावयास मिळतो. याबरोबरच या विभागाच्या इमारतीचीही दुरवस्था झाली आहे. खिडक्या, दारांसह छपराचे साहित्यही निकृष्ट बनले आहे. भिंतीही डागडुजीस आल्या आहेत. त्यामुळे या विभागाचेच विच्छेदन करून त्याची घटकांनुसार दुरुस्ती करणे गरजेचे आहे. या विभागाकडे जाणाऱ्या मार्गावरील तणकट, झाडे, वेली वाढल्या आहेत. यामुळे तेथे जाणेही धोक्याचे बनत आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांचा इथे उपद्रव वाढला आहे. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची अवस्थाही बिकट आले. निवासस्थानाचे छप्पर जीर्ण झाले असून, निवासस्थानाला तण, झाडे व वेलींनी वेढले आहे. रात्री-अपरात्री येथे जाताना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दररोज सरासरी दोनशेच्या आसपास रुग्ण येतात. त्यांची तपासणी अगदी काटकोर केली जाते. पण उपचार मात्र मलमपट्टीप्रमाणे प्राथमिकच केले जातात. या रुग्णांमध्ये बहुतांश सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांची संख्या मोठी असल्याने अधिक उपचारांसाठी त्यांना गोवा किंवा खासगी रुग्णालयात पाठवले जाते; पण अनेक रुग्ण परिस्थितीअभावी उपलब्ध डॉक्टरांनाच उपचार करण्यासाठी गयावया करतात.दरम्यान, यंत्रसामग्री असूनही केवळ नसता धोका कशाला या इथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वृत्तीने यंत्रेही धूळ खात पडून आहेतच, शिवाय त्याचबरोबरच रुग्णांनाही वेठीस धरले जात आहे. यामुळे येथील गरीब रुग्णांची मोठी परवड होत आहे. ‘रुग्णालय दिसायला मोठे; पण लक्षण खोटे’ अशी अवस्था उपजिल्हा रुग्णालयाची झाली आहे. पालकमंत्र्यांच्या पुढाकाराची गरजउपजिल्हा रुग्णालयांतील विविध समस्या आणि उपाययोजना याबाबतीत पालकमंत्री दीपक केसरकर यांना सविस्तर माहिती आहे. त्यांनी आपल्या प्रयत्नांनी इथे सुधारणेसाठी निधीची पूर्तता करून रुग्णालयाला सजविण्याचा प्रयत्न केला आहे; पण रुग्णालयातील रिक्त पदांसाठी त्यांनीच पुढाकार घेतला तर अनेक गरीब रुग्णांचा पैसा आणि प्राणही वाचतील. उपजिल्हा रुग्णालयात अपुऱ्या डॉक्टरांमुळे कार्यरत असलेल्या डॉक्टरांवर कामाचा ताण पडत आहे. एकाच डॉक्टरला दोन दोन दिवस सेवा करावी लागत आहे. यामुळे शासनाने रिक्त पदे भरण्याची आवश्यकता आहे. तसेच रुग्णालयाच्या सुधारणाबाबत पाठविण्यात आलेल्या कामांचा प्रस्ताव मंजूर झाला असून, प्रशासकीय मंजुरी लवकरात लवकर मिळणे आवश्यक आहे.- डॉ. उत्तम पाटीलवैद्यकीय अधीक्षकस्त्रीरोग व प्रसूती विभागात समाधानउपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूती विभागाचे कामकाज सुरळीत आहे. काही दिवसांपूर्वी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दुर्भाटकर यांची बदली करण्याचे आदेश आले होते. पण स्थानिक संघटना व नगरवासीयांच्या मोर्चाने ही बदली रद्द झाल्याने या विभागाचे कामकाज अत्यंत सुरळीत व उत्साहात सुरू आहे.
यंत्रणा असूनही केवळ मलमपट्टीच
By admin | Updated: August 1, 2015 00:36 IST