रहिमतपूर : ग्रामस्तरीय समितीकडून कामात कुचराई होत असल्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात दिरंगाई होत आहे. शासकीय आदेशाचे काटेकोर पालन करून बाधितांची संख्या आटोक्यात आणा, अशा शब्दांत प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी ग्रामस्तरीय समितीच्या सदस्यांची कानउघडणी केली.
कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरातील रहिमतपूर, अपशिंगे, सायगाव, सासुर्वे, दुर्गवाडी, साप आदी गावांना प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, मंडलाधिकारी विनोद सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी काही गावांमध्ये अनेक कोरोनाबाधितांना विलगीकरण कक्षात ठेवण्याऐवजी होम क्वारंटाइन केल्याचे दिसून आले. त्यामुळे संसर्ग आटोक्यात येत नसल्याचे निदर्शनास आले. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी गृहविलगीकरणाऐवजी बाधितांना विलगीकरण कक्षात ठेवावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे बाधितांना स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवून त्यांची योग्य ती सोय करुन ग्रामस्तरीय समित्यांनी शासकीय आदेशाचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना ज्योती पाटील यांनी केल्या आहेत. विलगीकरण कक्षाची पाहणी करून बाधितांशी चर्चा करून सोयीसुविधा पुरवल्या जातात का याची माहिती घेतली. दरम्यान या वेळी कोरोना ग्रामस्तरीय समितीमधील सदस्यांनी काही बाधितांना विलगीकरण कक्षात ठेवल्यास अडचणी येत असल्याचे सांगितले.
जनावरांचे पालनपोषण हा प्रश्न!
गाई व म्हशी असलेल्या बाधितांना विलगीकरण कक्षात ठेवल्यास त्यांच्या जनावरांना खाद्य पुरवणे व पालनपोषण करण्यामध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे असे बाधित पशुपालक विलगीकरण कक्षात येण्यास विरोध करत असल्याचे सांगितले. काहीही पर्यायी व्यवस्था करा परंतु बाधितांना विलगीकरण कक्षात ठेवून लवकरात लवकर संसर्गाची साखळी तोडा अशा स्पष्ट सूचना ज्योती पाटील यांनी केल्या आहेत.
फोटो : रहिमतपूर, ता. कोरेगाव परिसरातील गावांची पाहणी प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी केली.( छाया : जयदीप जाधव)
फोटो नेम : १५जयदीप