सातारा : आगामी विधानसभा निवडणुकीत ‘आम आदमी पार्टी’ महाराष्ट्रात उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते; मात्र जिल्हा संयोजक आणि स्वयंसेवकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय बदलला आहे. परिणामी जिल्ह्यातील सर्व आठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे पंधरा दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.पक्षाच्या नवी दिल्ली येथील कार्यालयाकडून प्रत्येक जिल्हा संयोजक आणि जिल्हा सचिवांना मेल पाठविण्यात आला असून त्यामध्ये काही मुद्यांवर चर्चा करण्यास सांगितले आहे. त्याचा अहवालही पाठवून देण्याची सूचना केली असल्याची माहिती ‘आप’चे जिल्हा सचिव सागर भोगावकर यांनी दिली.आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि सहकाऱ्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत अनेकांचे पानिपत करत सत्ता काबीज केली. मात्र, केजरीवालांनी राजीनामा दिला आणि लगेच लोकसभा निवडणूक जाहीर झाली. मात्र, पंजाबमधील चार जागा वगळता इतरत्र ‘आप’चा सफाया झाला. महाराष्ट्रात ‘आप’ विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा संयोजकांनी नाराजी व्यक्त केली आणि पक्षनेतृत्वाने यावर विचार करावा, असा मुद्दा मांडण्यात आला. परिणामी, महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यातही विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.यानंतर बुधवारी जिल्हा कार्यकारिणीला एक मेल पाठविण्यात आला असून त्यामध्ये काही माहिती भरून देण्याची सूचना करण्यात आली आहे. उमेदवार कोण असावा, प्रचाराचे मुद्दे काय राहतील, उमेदवाराविषयी असणारी मते, त्याचे सामाजिकदृष्ट्या असणारे स्थान याचाही विचार करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
आठही मतदारसंघांत ‘आप’चा शड्डू
By admin | Updated: July 3, 2014 00:48 IST