वाई : वाईमधील परवानाधारक मुद्रांक विक्रेते आणि दस्त लेखनिक ४० वर्षांपासून वाई तहसील कार्यालयाने ठरवून दिलेल्या जागेत बसत होते. सध्या तेथील इमारत पाडल्याने मोठी गैरसोय निर्माण झाल्याने नवीन इमारतीत बैठक व्यवस्थेसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर यांच्याकडे केली आहे.
गेल्या ४० ते ५० वर्षांपासून परवानाधारक असलेले मंगेश बाचल, रघुनाथ मालुसरे, जगन्नाथ जगताप, विद्याधर जगताप, विनोद सकुंडे, संदीप माने, संतोष शिंदे, प्रकाश बाबर, विलास जोशी, शिवाजी वाडकर असे १० जण वाई शहरातील तहसील कार्यालय आवारातील जागेत वाई, खंडाळा, महाबळेश्वर आणि राज्यातील खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी वाई येथे येणाऱ्या सर्व नागरिकांना स्टॅम्प पेपर देत होते. सर्व व्यवहार सुरळीतपणे पार पाडून शासनाच्या महसुलात भर टाकण्याचे काम विनातक्रार करत असत. पण, काही महिन्यांपूर्वी वाई महसूल कार्यालयाने प्रशस्त अशी इमारत नव्याने बांधल्याने त्या इमारतीच्या चौफेर कंपाऊंडचे बांधकाम करण्यासाठी सुरुवात करण्यात आली. त्यामुळे मुद्रांक विक्रेते आणि खरेदी विक्रीच्या दस्तांचे लिखाण करणाऱ्यांसाठी असणारी बैठक व्यवस्थेची इमारत पाडल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. मुद्रांक विक्रेते आणि दस्त लेखनिक यांना बैठक व्यवस्थाच नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार करणारे शेतकरी व इतर नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ही होणारी गैरसोय टाळण्यासाठी येथील स्टॅम्प विक्रेते आणी दस्त लेखनिक यांनी एकत्रित येऊन तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये बसण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.