सातारा : ‘अच्छे दिन’ येणार, अशी आस असतानाच वाढत्या महागाईने मात्र अनेकांच्या तोंडचा घास पळवला आहे. तीस रुपये किलोने मिळणाऱ्या भाजीने चक्क साठी ओलांडली आहे. भाजीच्या वाढलेल्या या टप्प्यामुळे सर्वसामान्यांचे पुन्हा एकदा कंबरडे मोडले आहे. आधी पेट्रोल आणि आता भाजीच्या दरांमधील वाढीमुळे येणारा पगार कुठे आणि कसा पुरवायचा असा प्रश्न नोकरदारांना पडला आहे.पावसाने ओढ दिल्याचा परिणाम भाजी उत्पादनावर झाला आहे. शहरात जिल्हाभरातून भाजीची आवक होते; पण मार्चपासून पडलेला कडक उन्हाळा आणि बेपत्ता झालेला पाऊस यामुळे शेतकरी अडचणीत आले. मिळेल तिथून पाणी आणून त्यांनी भाजीपाला टिकविण्याचा प्रयत्न केला; पण जून उलटूनही पाऊस नसल्याने भाज्यांचे उत्पादन घटले. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या ताटावर दिसू लागला. एक भाजी, आमटी, कोशिंबीर यासारखे जिन्नस असणारे ताट पाहण्याची सवय लागलेल्यांना भाजीच्या दराने पुकारलेला असहकार पचनी पडेनासा झालाय. मांसाहार करणाऱ्यांच्या घरात आठवड्यातून एक-दोनदा वेगळी चव चाखायला मिळते. मात्र, शुद्ध शाकाहारींच्या घरी जेवण म्हणजे महानगरांतील ‘कॉम्पॅक्ट फ्लॅट’ झालाय. जिथे जागा उपलब्ध नसल्यामुळे आहे त्याच्यातच सांभाळून घेणं क्रमप्राप्त झालंय. (प्रतिनिधी)
ओलांडली साठी.... मोडले कंबरडे!
By admin | Updated: July 4, 2014 00:26 IST