उरण : ग्रामसभेत जनतेच्या विविध प्रश्नांवर अर्थातच विविध समस्यांवर चर्चा, उपाययोजना होणे अपेक्षित असताना ग्रामसभेत जनतेच्या समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्याऐवजी कळंबुसरे गावच्या सरपंचाने प्रश्नांच्या भडिमाराच्या भीतीपोटी चक्क ग्रामसभेतूनच पळ काढला. या पळपुट्या सरपंचाच्या विरोधात कळंबुसरे ग्रामस्थांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.कळंबुसरे हे उरण पूर्व विभागातील गाव आहे. रविवारी ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेण्यात आली. गावातील प्रश्न मांडण्यासाठी या सभेला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात पाणी, रस्ते, वीज, ग्राम स्वच्छता, शाळेच्या नव्या इमारतीचा प्रश्न असे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. गेल्या साडेतीन वर्षाच्या कालावधीत सरपंच सुशील राऊत यांनी एकाही प्रश्नाला न्याय दिला नसल्याचा जनतेचा आरोप आहे. गावातील ग्रामस्थांकडून घरपट्टी नियमित वसूल करणारी ग्रामपंचायत या विभागातील कंपन्यांकडून मालमत्ता कर का वसूल करीत नाही, असा सवाल ग्रामसभेत उपस्थित केला आहे. या प्रश्नावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उपस्थित ग्रामस्थ संतप्त झाले. घरपट्टी थकविली म्हणून ग्रामस्थांची अडवणूक करणारा सरपंच मालमत्ता कर थकविणाऱ्या कंपनींवर जप्तीची कारवाई करण्याऐवजी कंपन्यांची दलाली करून त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देत असल्याचा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे.ग्रामस्थांनी ग्रामसभेत विविध प्रश्नांचा भडिमार केला. विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देता न आल्याने सरपंच सुशील राऊत यांनी ग्रामसभा अर्धवट सोडून पळ काढला. या निष्क्रीय सरपंचाचा कारभार पुढे चालू देणार नाही, असा इशारा भाजपाच्या संजय म्हात्रे यांनी दिला आहे. (वार्ताहर)
सरपंचाने काढला ग्रामसभेतून पळ
By admin | Updated: August 26, 2015 00:10 IST