पळसदेव : कुठेही पावसाचा थेंब नाही... विहिरी आटल्या... बोअरवेल गटकळ्या खात आहेत. तलाव कोरडे पडले आहेत अन् आता उजनी ‘डेंजर झोन’मध्ये गेल्याने पाण्यासाठी करायचे काय? असा प्रश्न सतावत आहे. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतातील उभी पिके जळून गेल्याने हातात काहीच राहिलं नसल्याने यंदाचं वरीस धोक्याचं, असे शब्द शेतकऱ्यांच्या तोंडून येत असल्याने पावसाळ्यात दुष्काळ, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.हंगाम पावसाळ्याचा असला, तरी कडक पडणारे ऊन, सोसाट्याचा वारा अन् कधीमधी येणारे ढगाळ वातावरण यामुळे जणू काही उन्हाळ्यासारखी परिस्थिती जाणवत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई अनेक गावांमध्ये जाणवू लागली आहे. शेतातील पिके जळू लागल्याने हताश शेतकरी हताश झाला आहे. विहिरी आटू लागल्या आहेत. विंधन विहिरी (बोअरवेल) बंद पडल्या आहेत. तलाव तर कधीच कोरडे पडले आहेत. त्यामुळे दुष्काळाची दाहकता जाणवत आहे. जनावरांना चारा व पाण्याची टंचाई भासत असल्याने गुरांचे कळप सैरभैर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दुसरीकडे उजनीची परिस्थितीही भयानक झाली आहे. सध्या उजनीमध्ये वजा टक्के पाणी आहे. त्यामुळे उजनी सध्या डेंजर झोनमध्ये आहे. कधी नव्हे एवढी भयानक परिस्थिती उजनीवर ओढवली आहे. त्यामुळे उजनीवर अवलंबून असणाऱ्या पुणे व सोलापूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना, औद्योगिक वसाहती अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे पाऊस कधी पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. उजनीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांना पाण्यासाठी पाईपची संख्या वाढविणे, चारी काढणे, केबलची संख्या वाढविणे आदी बाबी नित्याच्याच बनल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी कायपण, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
उजनी ‘डेंजर झोन’मध्ये
By admin | Updated: September 3, 2015 03:11 IST