डिंभे : धनत्रयोदशीला धान्याची रास घरात आणायची व भाऊबीजेला शेतावर बहिणीची भेट घ्यायची. फार तर या दिवशी बहिणीच्या शेतावर कामासाठी जाऊन बहिणीला दिवसभराच्या कष्टाची ओवाळणी द्यायची... आदिवासींना कशाचे गोडधोड आणि दिवाळी?दिवाळी म्हटले, की दिव्यांचा सण. नवनवीन कपडे फटाक्यांची आतषबाजी व गोडधोड जेवणाची मेजवानी. अंगणात रेखीव रांगोळी, तर उंच अकाशात लावलेले अकाशकंदील. मात्र, कष्टकरी आदिवासी जनतेची दिवाळी भातशेतातच जाते. हे धान्य तयार करून घरात आणले नाही, तर उदनिर्वाह कसा होणार? हा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. म्हणून आदिवासींना कशाचे गोडधोड आणि दिवाळी?याच दिवसांत डोक्यावर भाताचे भारे घेऊन आदिवासींची जगण्याची लढाई सुरू असते. रात्री टेंभ्याच्या उजेडात दिवसभर खळ्यात झोडून झालेल्या भाताची रास घरी वाहून आणण्याची घाई सुरू असते. दिवसभर भाताची कापणी करायची. भारे डोक्यावर वाहून खळ्यात आणायचे. ते झोडून संध्याकाळी उशिरापर्यंत भाताचे ओझे वाहून घरी न्यायचे. ऐन दिवाळीच्या हंगामात हाच काय तो दिनक्रम ठरलेला असतो. (वार्ताहर)
‘त्यांची’ भाऊबीज बांधावरच!
By admin | Updated: November 12, 2015 02:31 IST