पौड : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या धरण परिसरातही यंदा सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पाऊस झाला. दरवर्षी साधारणत: १५ आॅगस्टपर्यंत तुडुंब भरून वाहणारे मुळशी धरण आॅगस्ट महिना संपला, तरी केवळ ७० टक्केच भरलेले असल्याने पुढील काळातील पाणीटंचाई टाळण्यासाठी मुळशी प्राधिकरणाकडून पाणीकपात सुरू केली जाणार असल्याची माहिती या विभागाचे अधिकारी फुलारी यांनी दिली. या पाणीकपातीच्या बाबतचे सूचनापत्र २० ग्रामपंचायतींना देण्यात आले असून, याबाबत बैठक घेऊन पाणीकपात कधीपासून सुरू करायची ते ठरविण्यात येणार आहे.मुळशी प्राधिकरण योजनेचा लाभ घेणाऱ्या २० ग्रामपंचायती अंतर्गतची २३ गावे व ३१ वाड्या-वस्त्यांवर या योजनेंतर्गत दररोज नियमित व मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु भविष्यातील टंचाई टाळण्यासाठी मुळशीकरांना आता एक दिवसाआड पाणी घेण्याची सवय लावून घ्यावी लागणार आहे. मुळशी धरणाच्या पायथ्याला असलेल्या मालेगावापासून ते पौड, पिरंगुट व त्याच्या भोवताली औद्योगिक वसाहतीपर्यंत व संभवे गावापासून घोटावडेपर्यंतच्या २० ग्रामपंचायतींना या योजनेचा लाभ मिळतो. (वार्ताहर)
मुळशी प्राधिकरण करणार एक दिवसाआड पाणीपुरवठा
By admin | Updated: September 4, 2015 02:07 IST