पुणे : घरोघरी मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणराय आणि गौरार्इंचा विसर्जन सोहळा पार पडला. चैतन्याची लाट घेऊन आलेल्या गौैरींना महिलांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. या वेळी महिलांचे डोळे पाणावले होते.लाडक्या बाप्पानंतर माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौराईचेही थाटामाटात स्वागत करण्यात आले. माहेरवाशिणीचे प्रतीक म्हणून गौरीला मानले जाते. दोन दिवसांसाठी आलेल्या या माहेरवाशिणीची तयारी करण्यासाठी पारंपरिक वेश परिधान केलेल्या महिलांची लगबग सुरू होती. घरोघरी गौरीला नैवेद्य दाखवण्यात आला. तिसऱ्या दिवशी गौरीची पूजा करून गणपतीबरोबर नैवेद्य दाखवण्यात आला. विसर्जनाच्या वेळी पाणवठ्यावर गौरींची पूजा करण्यात आली. गूळ खोबरे, साखर खोबरे, वाटली डाळ, फळे असा नैवेद्य दाखवून तिची सासरी पाठवणी करण्यात आली. तिला खीर-कानवल्याचा (करंजीचा प्रकार मुरड घालून करतात, गौर मुरडून परत यावी म्हणून) नैवेद्य दाखवून तिची पाठवणी (विसर्जन) करतात.नद्या, तलाव आणि महापालिकेच्या विसर्जनाच्या इतर ठिकाणी गौरार्इंना आणि बाप्पांना निरोप देण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
भावपूर्ण वातावरणात गौैरींना निरोप
By admin | Updated: September 11, 2016 01:20 IST