जिल्ह्यात कोरोनाची सुरुवात एप्रिल २०२० मध्ये झाली. तेव्हापासून आजतागायत पहिली ते दहावीच्या शाळा बंद आहेत. यामुळे मुले घरीच आहेत, तर पालकही पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान लाॅकडाऊनमुळे घरीच होते. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे क्लासेस ऑनलाइन पद्धतीने सुरू होते. या ऑनलाइन क्लासेसमुळे विद्यार्थ्यांच्या हातामध्ये मोबाइल आला आहे. या क्लासेसच्या नावाखाली विद्यार्थी बराच वेळ मोबाइल पाहण्यात, तसेच मोबाइलवरील गेम खेळण्यात घालवीत आहेत. यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. यातच विद्यार्थीही बराच कालावधी मोबाइलवर घालवीत असल्याने त्यांच्याही स्वभावामध्ये तसेच वागण्या-बोलण्यात बदल होत आहेत. या दोन्हीचा परिणाम पालक आणि विद्यार्थी यांच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसून येते. यामुळे अनेक पालकांची, तसेच मुलांची चिडचिड होणे, भीती वाटणे, अभ्यासात मन न लागणे असे प्रकार घडत आहेत.
वर्गनिहाय विद्यार्थी
पहिली ३४९७९
दुसरी ३६६०५
तिसरी ३८१६४
चौथी ३७२१९
पाचवी ३७३००
सहावी ३६२६३
सातवी ३५६४३
आठवी ३५५६९
नववी ३२३००
दहावी २८४४०
मुलांच्या समस्या
शाळा बंद असल्याने मुलांची दिनचर्या बिघडली आहे. यामुळे त्यांचे अभ्यासात मन लागत नसल्याचे दिसून येते, तसेच अतिप्रमाणात मोबाइलचा वापर केल्याने झोपेवरही परिणाम होत आहे. यात चिडचिडेपणा आणि चिंता वाढत असल्याचे दिसून येते.
पालकांच्या समस्या
मुलांच्या शिक्षणासाठी असलेल्या ऑनलाइन अभ्यासाचा पर्याय पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. यामध्ये ऑनलाइन क्लास झाल्यानंतरही मुले बराच वेळ मोबाइल पाहत बसतात, तसेच त्यावर गेम खेळतात. याबाबत मुलांना बोलल्यानंतर चिडचिड करून मुले त्रागा करीत असल्याचे दिसून येते. यामुळे मुलांना दिवसभर सांभाळताना पालकांची कसरत होत आहे.
पालकांनी पहिली ते दहावीच्या वयोगटातील विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल अशा बाबी शिकवाव्यात, तसेच लहान मुलांच्या हाताला वेगवेगळ्या कामांची सवय लावावी. यात त्यांचा वेळ जाऊ शकतो, तसेच विद्यार्थ्यांनी घरीच बसून न राहता मोकळ्या मैदानावर जाऊन खेळ खेळावेत. राज्य शासनाने नियमांच्या अटीवर शाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी. - डाॅ. जगदीश नाईक, मानसोपचार तज्ज्ञ