तुम्ही अभ्यास करताय; फोन सायलेण्टवर टाकलाय!
मोबाइल डाटा तर बंदच करून ठेवलाय.
परीक्षा अगदी जवळ आली आहे; म्हणून तुम्ही दे दणादण रट्टा मारताहात.
पण मन मात्र इतकं उतावीळ, जीव कासाविस असं वाटतं; एकदा तरी मोबाइल डाटा ऑन करावा.
पाहावं तरी ग्रुपवर काय चाललंय.
कोण काय म्हणतंय.
एकदाच पाहावं.
दोन मिनिटं.
फक्त दोन मिनिटं..
खूप खूप रोखता तुम्ही स्वत:ला.
पण मन ऐकत नाही.
जिवाची तगमग होते.
मग तुम्ही मोबाइल डाटा ऑन करता, व्हॉट्सअँपवर जाता..
आणि मग.?
तिथंच रेंगाळता. गप्पा छाटत बसता.
ग्रुपवर न राहवून बोलता.
इतकंच कशाला, तिथं सामसूम असली, एकही नवा मॅसेज दिसला नाही तरी तुम्ही अस्वस्थ होता.
अभ्यासातलं तुमचं चित्तच उडतं.
मन लागत नाही. आपण काय वाचतोय हेच कळत नाही.
मग खूप चिडचिड होते.
राग येतो की, आपण किती या सार्याच्या आहारी गेलो आहोत. आपल्या करिअरचा प्रश्न आहे, अभ्यास अजून काहीच नाही, मार्क नाही पडले भरपूर तर वाट लागेल हे आपल्याला माहिती आहे.
पण तरी आपल्याला व्हॉट्सअँप पाहिल्याशिवाय चैन पडत नाही!
हे असं माकड का झालंय आपलं?
सतत ‘व्हॉट्सअँप म्हणणारं माकड’?
त्यात आईबाबांची कटकट. ते म्हणतात, बाकी सगळं बरं पण हा हातातला मोबाइल आधी फेकून द्यायला पाहिजे. भिकेचे डोहाळे. उद्या कुठं अँडमिशन मिळणार नाही तेव्हा बसा रडत!
पण या अशा परस्थितीत करायचं काय?
टाळायचं कसं व्हॉट्सअँप?
फोकस कसं करायचं?
मुख्य म्हणजे करायचं काय?
नेमकं होतंय काय हे मुलांचं?
***
तुमच्या मनातले हेच सारे प्रश्न आम्ही सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टींना विचारले.
आणि त्यांनी या विषयाकडे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी दिली आहे.
ते काय म्हणतात; वाचा त्यांच्याच शब्दात.
- ऑक्सिजन टीम