कोलकाता : उमेश यादव (१३ धावांत तीन बळी) आणि मोर्ने मोर्केल यांच्या भेदक मारयाच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने बुधवारी आयपीएल-७ च्या पहिल्या प्ले आॅफमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबवर २८ धावांनी सरशी साधून अंतिम फेरीत धडक दिली. गुणतालिकेत अव्वल स्थान पटकविणार्या पंजाब संघाची मात्र पराभवानंतर प्रतिक्षा लांबली. केकेआरने नाणेफेक गमविल्यानंतर फलंदाजी करीत ८ बाद १६३ पर्यंत मजल गाठली. रॉबिन उथप्पाने सर्वाधिक ४२ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब संघ ८ बाद १३५ धावा करु शकला. उमेश यादव केकेआरच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने चार षटकांत १३ धावा देत तीन गडी बाद केले. मोर्केलने २३ धावांच्या मोदबल्यात दोन गडी बाद केले. किंग्ज पंजाबकडून रिद्धिमान साहाने सर्वाधिक ३५ धावा ठोकल्या. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील केकेआरने आयपीएलमध्ये दुसर्यांदा अंतिम फेरी गाठली. याआधी २०१२ साली केकेआर चॅम्पियन होता. किंग्ज इलेव्हन पंजाबला पराभवानंतर फायनलमध्ये प्रवेश करण्याची आणखी एक संधी राहील. त्यासाठी या संघाला एलिमिनेटरमधील विजेत्या संघाविरुद्ध ३० मे रोजी सामना खेळावा लागणार आहे. पावसामुळे पहिला ‘प्ले आॅफ’ सामना मंगळवारी होऊ शकला नव्हता. बुधवारी देखील पावसाने व्यत्यय आणला पण सामना बंद पडेल इतका गोंधळ उडाला नव्हता. या सामन्यावर गोलंदाजांनी वर्चस्व गजविले. पंजाबकडून डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल याने चार षटकांत ११ धावा देत दोन, लेग स्पिनर कर्णवीरसिंग याने ४० धावांत तीन आणि जलद गोलंदाज मिशेल जॉन्सन याने ३१ धावा देत दोन गडी बाद केले. केकेआरने तीन फिरकी गोलंदाजांना संघात स्थान दिले होते पण उमेश यादव आणि मोर्केल या दोन्ही जलद गोलंदाजांनीच विजयात मोलाची भूमिका वठविली. लेग स्पिनर पीयूष चावला याने २३ धावा देत एक गडी बाद केला. त्याआधी चांगली सुरुवात झाल्यानंतरही मधल्या फळीतील फलंदाजांना लाभ उठविता न आल्याने केकेआरची फलंदाजी भरकटली होती. तरीही या संघाने ८ बाद १६३ पर्यंत मजल गाठलीच. सलामीचा रॉबिन उथप्पाने सर्र्वाधिक ४२ (३० चेंडू, चार चौकार, दोन षटकार) धावा केल्या. तो बाद होताच पंजाबच्या फिरकीपटूंपुढे मधल्या षटकांत झटपट गडी बाद झाले. कर्णधार गौतम गंभीर (१) लवकर बाद झाला. उथप्पा आणि मनीष पांडे यांनी ६७ धावांची भागीदारी केली. अक्षरने या दोघांना चार चेंडूंच्या फरकाने तंबूची वाट दाखवली. युसूफ पठाण २०, शकिबने १८ धावा केल्या. १६.४ षटकांचा खेळ झाला तोच पावसाने २० मिनिटे खोळंबा घातला. त्यावेळी केकेआरच्या ५ बाद ११३ धावा होत्या. खेळ पूर्ववत होताच सूर्यकुमार यादव २०, डोएशे १७ आणि पीयूष चवलाने नाबाद १७ धावांचे योगदान देत संघाला तारले. (वृत्तसंस्था)
केकेआर अंतिम फेरीत
By admin | Updated: May 29, 2014 04:27 IST