ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ३ - केंद्रीय ग्रामविकास मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीत अपघाती निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. दुपारी मुंडे यांचे पार्थिव राज्यात आणले जाणार असून उद्या परळी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्रीपदावर विराजमान झालेल्या गोपीनाथ मुंडे यांचा मंगळवारी सकाळी बीड आणि परळी येथे सत्कार करण्यात येणार होता. या कार्यक्रमासाठी मुंडे दिल्लीहून महाराष्ट्रात यायला निघाले होते. सकाळी सहाच्या सुमारास मुंडे त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानाहून दिल्ली विमानतळाच्या दिशेने रवाना झाले. मात्र विमानतळाच्या दिशेने जात असताना त्यांच्या अॅम्बेसेडर गाडीला एका वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात मुंडे गंभीर जखमी झाले होते. त्यांना एम्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्रकृती आणखी खालावली. सकाळी आठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
मुंडेचे पार्थिव आधी दिल्लीतील भाजप कार्यालयात नेण्यात येईल. तिथून दुपारी विमानाने लातूर येथे आणले जाईल. लातूरहून बीड येथील मुंडे यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असे गडकरींनी सांगितले.
या अपघाताचे वृत्त समजतात राज्यातील भाजपचे नेते दिल्लीच्या दिशेने रवाना झाला असून मुंडे यांचे कुटुंबही दिल्लीच्या रवाना झाले आहेत. पोलिसांनी मुंडे यांच्या गाडीला धडक देणा-या वाहनचालकाला अटक केली असून त्याची चौकशी सुरु असल्याचे दिल्ली पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी सांगितले. मुंडेंच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे.