राज्यात जाणवू लागला उकाडा
By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST
पुणे : अवकाळी पावसाचे सावट दूर सरल्याने राज्याच्या तापमानात गेल्या ४-५ दिवसांमध्ये सातत्याने वाढ दिसून येत आहे. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागली असून उकाडा जाणवू लागला आहे. आज राज्यात सर्वाधिक ३८.९ अंश सेल्सिअस तापमान सोलापूरमध्ये नोंदविले गेले.
राज्यात जाणवू लागला उकाडा
पुणे : अवकाळी पावसाचे सावट दूर सरल्याने राज्याच्या तापमानात गेल्या ४-५ दिवसांमध्ये सातत्याने वाढ दिसून येत आहे. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागली असून उकाडा जाणवू लागला आहे. आज राज्यात सर्वाधिक ३८.९ अंश सेल्सिअस तापमान सोलापूरमध्ये नोंदविले गेले.मार्च महिन्याच्या पहिले पंधरा दिवस राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे ऐन मार्च महिन्यातही राज्याचे तापमान सरासरीपेक्षा ३ ते ७ अंशांनी खाली होते. त्यामुळे या काळात उन्हाळ्याच्या झळांऐवजी राज्यात थंडीचा कडाका जाणवत होता. मात्र गेल्या ४ दिवसांपूर्वी राज्यावरील अवकाळी पावसाचे ढग पूर्णपणे सरले. आता राज्यात हवामान कोरडे राहत असल्याने लगेचच तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली. आज सोलापूरपाठोपाठ अहमदनगरचे तापमान ३८.५ अंश, परभणीचे तापमान ३८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुढील ४ दिवस राज्यातील हवामान कोरडेच राहणार असल्याने तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.३, अहमदनगर ३८.५, जळगाव ३६.७, कोल्हापूर ३६.३, महाबळेश्वर ३०, मालेगाव ३६.३, नाशिक ३५.६, सांगली ३६.३, सातारा ३६.४, सोलापूर ३८.९, मुंबई ३४.२, अलिबाग ३३.८, रत्नागिरी ३१.६, डहाणू ३१.३, उस्मानाबाद ३६.६, औरंगाबाद ३६, परभणी ३८, नांदेड ३७.५, अकोला ३६.८, अमरावती ३४.६, बुलडाणा ३४.७, ब्रम्हपुरी ३६, चंद्रपूर ३७.८, नागपूर ३५.२, वाशिम ३५.२, वर्धा ३५, यवतमाळ ३३.८.---