नवी दिल्ली : नागालँडमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी सय्यद फरीद खान याला कारागृहातून बाहेर खेचत ठार मारण्यात आल्याच्या प्रकरणाचे सोमवारी लोकसभेत संतप्त पडसाद उमटले. आसाममधील काँग्रेसच्या खासदारांनी नागालॅँड सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला.शून्य तासाला हा मुद्दा उपस्थित करताना काँग्रेसचे गौरव गोगोई म्हणाले की, सय्यद फरीद खान हा भारतीय नागरिक आहे. बांगलादेशी नाही. कारागृहातील केंद्रीय दल त्याचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. न्यायालयाने त्याला दोषी ठरविले नव्हते, त्यामुळे त्याला सुनावणीचा हक्क होता. या भागातील मुस्लिमांना बांगलादेशी मानले जाते; मात्र खान हा एका लष्करी कुटुंबातील होता.काँग्रेसच्या सुष्मिता देव यांनी ईशान्येकडील लोकांकडे वांशिक दृष्टिकोनातून बघितले जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा काही समुदायातील लोक एकजूट होत असल्याने त्याला नवे वळण मिळते. त्यामुळे अशा घटनांवर नियंत्रण आणायला हवे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
दिमापुरात बलात्का-याची हत्या; लोकसभेत पडसाद
By admin | Updated: March 9, 2015 23:41 IST