अतुल शेवाळे : मालेगावमालेगाव, सटाणा, ताहाराबाद परिसरातील ८१ हजार २१६.२६८ हेक्टर वनपरिक्षेत्रातील ३४८ वन्यजिवांचा अधिवास धोक्यात आला आहे. सध्या कसमादे परिसरातील तपमानाने चाळिशी गाठली आहे. असे असताना वनविभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे यंदा जंगलांमध्ये पाणवठे व वनतळे निर्मितीचे काम हाती घेण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परिणामी अन्न व पाण्याच्या शोधार्थ वन्यजिवांनी मानवी वस्तीकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांपासून कसमादे परिसरात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली होती. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेती, शिवारे बहरली होती; मात्र सध्या वैशाख वणव्याची धग बसू लागली आहे. तपमानाचा पारा ४३ अंशावर पोहोचला आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माणसांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसताना जंगलातील प्राण्यांना पाणी कोठून उपलब्ध होणार? मालेगाव उपविभागीय वन कार्यालयाच्या कक्षेत मालेगाव, सटाणा व ताहाराबाद परिसरातील जंगलक्षेत्राचा समावेश आहे. या ८१ हजार २१६.२६८ हेक्टर वनक्षेत्रात यंदा एकही वनतळे वा पाणवठे निर्माण करण्यात आले नाहीत. पाणवठे व वनतळे निर्मितीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचा दावा येथील वनविभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केला आहे. शासनाचा लालफितीचा कारभार व प्रस्ताव मंजुरीसाठी लागणारा वेळ यात वन्यजिवांचे काय होणार, असा सवाल प्राणिमित्रांनी व्यक्त केला आहे. सन २०१४-१५ मध्ये १६२ वनतळी बनविण्यात आली होती, तर चिंचवे, निंबायती, टेंभे, जाखोड, मानूर, मोरदरा, वाडीचौलेर, पिंपळदरे, सकर आदि ठिकाणी १३ पाणवठे निर्माण करण्यात आले होते. उन्हाची तीव्रता भयानक आहे. कसमादे परिसरात उष्णतेची लाट पसरली आहे. जंगल परिक्षेत्रात पाणी उपलब्ध नसल्याने प्राण्यांनी अन्न व पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्त्यांकडे धाव घेतली आहे.
मालेगाव वनपरिक्षेत्रातील वन्यजीव पाण्याअभावी कासावीस
By admin | Updated: March 30, 2017 00:59 IST