नाशिक : अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी बोगस बियाणे व खतविक्रेत्यांच्या विळख्यात सापडला आहे़ शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील असून, बोगस बियाणे, खते व कीटकनाशके विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले़ जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये आगामी वर्षाच्या जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीत ते बोलत होते. महाजन पुढे म्हणाले की, अवकाळी पाऊस, गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे एकरी लाखो रुपये खर्च करून उभे केलेले पीक मातीमोल होत असून, यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे़ तसेच पीकविमा योजनेतून मिळणारी मदतही तोकडी ठरत असून, यासाठी नवीन पीक विमा योजना आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे़ गतवर्षी कन्नड व जालना येथून आणलेली कांद्याची बियाणे बोगस निघाले़ केवळ कांदाच नव्हे, तर तूर, सोयाबीन, कापूस यांची बियाणेही खराब निघाली, ही झाडे तर जोमाने वाढली मात्र त्यास फळच आले नाही़ बोगस बियाणांचा संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना फटका बसला असून, अशा विक्रेत्यांवर कडक कारवाई व्हावी यासाठी कायद्यात बदल करण्याबाबत विचार सुरू आहे़शाश्वत व सुरक्षित शेतीस सरकार प्राधान्य देणार आहे़ यासाठी शेतकऱ्यांना शेडनेट, ठिबक सिंचन यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे़ तसेच शेडनेट कमी दरात मिळावे यासाठी राज्यातीलच दोन कंपन्यांशी बोलणे सुरू आहे़ तसेच शेडनेटवरील आयातकर कमी करणे, शेडनेटसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज भरण्याचा राज्य सरकारचा निर्णयही अंतिम टप्प्यात आहे.राज्याला दुष्काळ व टंचाईतून मुक्त करण्यासाठी शासन ‘जलयुक्त शिवार अभियान’ ही क्र ांतिकारी योजना राबवित आहे. पाण्याचा अतिवापराने मातीचा पोत खराब होतो त्यामुळे ठिबक सिंचनातून कमी पाण्याद्वारे अधिक उत्पादन घेण्यासाठी जनजागृती केली जाणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले़ यावेळी त्यांच्या हस्ते या अभियानाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी बैठकीस आमदार डॉ. राहुल अहेर, बाळासाहेब सानप, नरहरी झिरवाळ, राजाभाऊ वाजे, दीपिका चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, विभागीय कृषी सहसंचालक कैलास मोते, जिल्हा परिषद, कृषी, महसूल या विभागांचे अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी) —ठळक—* पीकविमा योजनेतील निकषांमध्ये लवकरच बदल.* शाश्वत व संरक्षित शेतीसाठी शेडनेटच्या व ठिबकसाठी कर्ज व प्रोत्साहन.* बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई.* प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीचे पंचनामे व त्यानुसार भरपाईचे अध्यादेश.* शेडनेट उत्पादनासाठी उद्योगपतींशी चर्चा.
बोगस बियाणे, खतविक्रेत्यांविरोधात अजामीनपात्र गुन्हे : गिरीश महाजन
By admin | Updated: May 10, 2015 00:12 IST