नाशिक : शहरातील दोन हजार वृक्षतोडीस हरकत घेणाऱ्या उत्साही मंडळींनी महापालिकेत शनिवारी झालेल्या सुनावणीकडे मात्र पाठ फिरवली. ६६ हरकतदारांना पाचारण करण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात मात्र १९ जणांनीच हजेरी लावली. वृक्षगणनेशिवाय वृक्षतोड करू नये, अशी मागणी करतानाच अनेकांनी आधी रस्त्यालगतची अतिक्रमणे काढा, मगच वृक्षतोडीच्या पर्यायाचा विचार करा अशा सूचना केल्या आहेत.कुंभमेळ्याच्या पाश्वभूमीवर शहराच्या विविध भागांत रस्ते विकास करण्यात येत असून, त्यात बाधित होणाऱ्या दोन हजार झाडांवर कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यास अनेक वृक्षप्रेमींनी हरकत घेतली आहे. नाशिक शहरातील वृक्षतोडीसंदर्भात या आधीच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल असून, त्याअंतर्गत नाशिक शहरातील वृक्षतोडीचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वृक्षतोडीस हरकत किंवा सूचना करणाऱ्यांना वनखात्याच्या वनसंरक्षक कार्यालयात निवेदन देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार १३४ व्यक्ती आणि संस्थांनी हरकती घेतल्या. त्यावर आता दोन दिवस सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार गठीत समितीचे अध्यक्ष तथा वनसंरक्षक अरविंद पाटील आणि सदस्य डॉ. दिगंबर मोकाट तसेच डॉ. संदीप जाधव यांच्या समितीसमोर शनिवार आणि रविवार, असे दोन दिवस हरकतींची सुनावणी घेण्यात येणार आहे. शनिवारी ६६, तर रविवारी ६७ हरकतदारांना पाचारण करण्याचे नियोजन होते. परंतु पहिल्याच दिवशी ६६ पैकी केवळ १९ हरकत घेणारेच उपस्थित होते. त्यामुळे अगोदर हरकत घेणाऱ्यांचा उत्साह अचानक कसा मावळला असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)
वृक्षतोडीस हरकत;सुनावणीकडे मात्र पाठ फिरवली.
By admin | Updated: December 28, 2014 01:11 IST