धनंजय वाखारे नाशिकसन २०१२ मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसची सारी सूत्रे ज्याठिकाणाहून हलविली गेली, जेथून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द अंतिम मानला गेला, तो मुंबई - आग्रा महामार्गावरील ‘भुजबळ फार्म’ आता २०१७च्या निवडणुकीत पुरता सुनासुना आहे. त्याऐवजी, भुजबळ यांच्याच प्रयत्नांतून उभे राहिलेले राष्ट्रवादी भवन आता निवडणुकीचे मुख्य केंद्र बनले असून, दोलायमान स्थितीत असलेल्या राष्ट्रवादीला भुजबळांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे.नाशिक महापालिकेत १९९२ पासून लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली. आजवर झालेल्या पाचही पंचवार्षिक निवडणुकांत नाशिकचे भूमिपुत्र व राज्याच्या राजकारणात दबदबा असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे नेतृत्व कायम राहिले. भुजबळ सांगतील तोच शब्द प्रमाण मानत नाशकात आधी शिवसेनेची नंतर राष्ट्रवादीची वाटचाल सुरू राहिली. सन २०१२ मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत कॉँग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडीची सारी सूत्रे छगन भुजबळ व त्यांचे पुतणे खासदार समीर भुजबळ यांच्याकडे होती. मुंबई - आग्रा महामार्गावरील भुजबळ फार्म हेच राष्ट्रवादीतील प्रत्येक घडामोडीचे केंद्र असायचे. भुजबळ बंगल्यावरून आलेला निरोप हाच अंतिम मानला जायचा. पक्षाच्या बैठकाही याच बंगल्यावर व्हायच्या आणि निवडणुकीतील उमेदवारांना महत्त्वाच्या अशा अेबी फार्मचेही वितरण याच ठिकाणाहून व्हायचे. सन २०१२च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस बाजी मारेल आणि भुजबळांच्या स्नुषा शेफाली समीर भुजबळ या महापौर बनतील, अशी जोरदार हवा निर्माण झाली होती. परंतु, राज ठाकरे यांच्या एका सभेने गणित बिघडविले आणि राष्ट्रवादीसह अन्य सेना - भाजपासारखेही पक्षही डळमळले. मनसेने तब्बल ४० जागांवर कब्जा केला, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला २० जागा आल्या. पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. परिस्थिती बदलली आहे. गेल्या दहा - अकरा महिन्यांपासून छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ हे दोघेही विविध आरोपांमुळे आर्थररोड तुरुंगात आहेत. आता २१ फेबु्रवारीला होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडे भुजबळांसारखे नेतृत्व नसल्याने नेत्यांसह कार्यकर्ते सैरभैर अवस्थेत आहेत. त्यातच राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांनी विविध आरोपांमुळे पक्षाची मलिन झालेली प्रतिमा पाहून दुसऱ्या पक्षात उड्या मारल्या आहेत. २०१२ मध्ये निवडणुकीचे मुख्य केंद्र बनलेला भुजबळ फार्म आता सुनासुना झाला आहे. भुजबळांचे कुटुंबीय व नातेवाईक वगळता तेथे कोणाचाही वावर नाही. त्याऐवजी आता भुजबळांनीच उभारलेले राष्ट्रवादी भवन मुख्य केंद्र बनले आहे. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होऊनही अद्याप राष्ट्रवादी भवन येथे वर्दळ दिसून येत नाही. भुजबळांविना पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राष्ट्रवादीची स्थिती दोलायमान आहे. त्यामुळे यंदा आघाडी करण्यास कॉँग्रेसचीही पावले अडखळत आहेत.
भुजबळ फार्मवर सन्नाटा; राष्ट्रवादी भवन बनले केंद्र
By admin | Updated: January 15, 2017 01:05 IST