नाशिक : काझीची गढी ढासळत असल्याने येथील रहिवाशांचे स्थलांतर करण्यासाठी शासकीय यंत्रणेने केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत. सकाळी पावसाने उघडीप दिल्यानंतर येथील रहिवाशांनी नकार दिला. त्यांना राजी करण्याकरिता अधिकाऱ्यांनी बरेच प्रयत्न केले; परंतु उपयोग झाला नाही.काझीची गढी ही अनेक वर्षांपासून धोकादायक आहे. परंतु गेल्या नोव्हेंबरपासून ही गढी खचण्यास सुरुवात झाली. त्यानंतर गढीला संरक्षक भिंत बांधण्याचा पर्याय पुढे करण्यात आला होता. त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. परंतु गेल्या सोमवारपासून शहरात पावसाने जोर धरल्याने गढीचा काही भाग खचला आहे. अनेक रिकामी घरे त्याबरोबर कोसळली. महापालिकेने दक्षता घेतल्याने जीवितहानी झाली नाही. तथापि, गढी अधिक प्रमाणात खचली तर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु रहिवासी जागा सोडण्यास तयार नाहीत. गुरुवारी पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ तसेच स्थानिक नगरसेवकांनी मध्यस्थी केली आणि रहिवाशांना काझीची गढी येथे स्थलांतरित होण्यास राजी केले. गाडगे महाराज धर्मशाळेत स्थलांतर करण्यासाठी धर्मशाळेचे भाडे शासन किंवा महापालिका भरेल असे सांगण्यात आले. त्यामुळे स्थलांतरास येथील रहिवासी तयार झाले. शनिवारपासून हे रहिवासी स्थलांतरित होणार होते; परंतु आज त्यांनी नकार दिला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबरच जिल्हा पुनर्वसन अधिकारी मधुमती सरदेसाई यांनी रहिवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचाही उपयोग झाला नाही. (प्रतिनिधी)
रहिवाशांचा स्थलांतरास नकार
By admin | Updated: August 2, 2014 01:22 IST