नांदगाव : नांदगाव रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म ३ वर रविवारी (दि. ८) पहाटे ४ वाजेदरम्यान एकलहरे वीज निर्मिती केंद्राकडे जाणाऱ्या (कोळसा वाहून नेणाऱ्या) मालगाडीच्या तीन डब्यांना आग लागल्याने धावपळ उडाली. वेळीच आग विझविण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. स्टेशनवर पॉर्इंटमन ताराचंद बोरसे यांना स्टेशनवर उभ्या असलेल्या गाडीच्या कोळसा भरलेल्या बोगीतून धूर बाहेर येत असल्याचे दिसले. त्यांनी स्टेशन उपप्रबंधक अवदेशकुमार यांच्याकडे धाव घेऊन माहिती दिली. रेल्वे पोलीस नरेंद्र पाडवी, योगेश बोरसे यांनी अग्निशमनबंबासाठी नगरपालिकेत संपर्क साधला असता येथील बंब उपलब्ध होणार नाही, असे पालिका कर्मचारी राजू पाटील व गोसावी यांनी माहिती दिल्यावरून मनमाड पालिकेच्या बंबाला तातडीने पाचारण करण्यात आले. दरम्यान, रेल्वे स्टेशनवर पिण्याच्या पाण्याच्या नळावरून प्लॅस्टिक पाइपने धूर येत असलेल्या ठिकाणी पाणी मारायला सुरुवात केली. लक्षात आलेला १३ नंबरचा डबा उष्णतेने लाल होऊ लागला होता. त्याचवेळी १४ व १८ नंबरच्या डब्यांमधून धूर येऊ लागल्याचे दिसले. ८ वाजता मनमाडचा बंब घटनास्थळी पोहोचला. मालगाडीपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नसल्याने आगग्रस्त रेल्वे गाडीला स्टेशनमधून १०० मीटर पुढे चालविण्यात आले तेव्हा कुठे १३ नंबरचा डबा बंबाच्या पाणी मारण्याच्या रेंजमध्ये आला. सुरक्षेच्या कारणासाठी, आग विझविताना मुंबईकडे जाणाऱ्या लोहमार्गावरील ओएचई (ओव्हरहेड इक्विपमेंट) वीज बंद करण्यात आली होती. सदर २० किमीच्या विभागात एकही गाडी थांबविण्यात आली नव्हती. त्यानंतर अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी तीनही बोग्यांवर पाण्याचा मारा करून आगीचा संभाव्य धोका टाळला. स्टेशन प्रबंधक अमरचंद अग्रवाल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आग विझविण्याची संपूर्ण प्रक्रिया सुलभरीतीने पार पाडली. रेल्वेपोलीस शिवाजी इघे, मनमाड अग्निशामक दलाचे जॉर्ज स्वामी, रवींद्र बगाडे, सुभाष बोडखे, रामलाल डिंबर, तुषार पांडे, महेंद्र गायकवाड यांनी आग विझवण्यासाठी मदत केली. (वार्ताहर)
मालगाडीच्या डब्यांना आग
By admin | Updated: January 9, 2017 01:05 IST