नाशिक : घराघरात पोहोचलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करणे सहज शक्य झाल्याने एका घरात किमान चार ते पाच मोबाइल सहज आढळतात. मोठ्यांपासून ते लहानग्यांपर्यंत अॅँड्रॉइड मोबाइल असणे प्रतिष्ठेचे समजले जात आहे. मात्र यामुळे धोकेही वाढले असून, सायबर गुन्हेगार लहानग्यांवर डोळा ठेवून आहेत. २०१२ मध्ये केलेल्या सर्व्हेनुसार सायबर गुन्हेगारीचे शिकार ठरत असलेले ८ ते १७ वर्ष वयोगटातील मुलांचे प्रमाण ३५ टक्के आहे. त्यामुळे पालकांनी याबाबत सतर्कता बाळगावी, असे प्रतिपादन सायबरतज्ज्ञ रक्षित टंडन यांनी केले. कालिदास कलामंदिर येथे जैन सोशल गु्रपतर्फे आयोजित ‘सायबर सेक्युरिटी’ या विषयावर ते बोलत होते. पुढे बोलताना रक्षित यांनी सांगितले की, आपल्या चहूबाजूने हॅकर्सचे जाळे पसरलेले आहे. इंटरनेट वापरताना आपल्याकडून होत असलेल्या चुकांवर हे बारीक लक्ष ठेवून असतात. त्यातच अल्पवयीन मुले सोशल मीडियाच्या माध्यमातून इंटरनेटवर सक्रिय असल्याने हॅकर्स त्यांनाच लक्ष्य करीत असल्याचे गेल्या काही वर्षांत घडलेल्या घटनांवरून समोर आले. त्यामुळे पालकांनी याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. हॅकर्सचे बळी केवळ लहान मुलेच ठरतात असे अजिबात नाही, तर मोठे तथा उच्चशिक्षितांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे काही मूलभूत व सोप्या बाबी लक्षात ठेवल्यास तंत्रज्ञानाचा प्रभावी व सुरक्षितपणे वापर करता येत असल्याचे टंडन यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महिला तसेच लहान मुलांना इंटरनेट वापरताना विशेष दक्षता घेण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच फेसबुकवर १३ वर्षांपेक्षा कमी व व्हॉट्स अॅपवर १६ वर्षापेक्षा कमी मुलांनी अकाउंट ओपन करू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. यावेळी अजय ब्रह्मेचा, विजय लोहाडे, तरुण कादरी, हेमंत दुग्गड, विनोद पहाडे आदि उपस्थित होते.
सायबर गुन्हेगारांचा चिमुकल्यांवर डोळा
By admin | Updated: July 20, 2015 00:39 IST