लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : ढगाळ वातावरण, कमी झालेले तापमान आणि धुके यामुळे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ बहरले आहे. परंतु या बहराला पर्यटकांची संख्या लाभत नसल्याचे चित्र असून, सध्या पर्यटकांची तुरळक हजेरी असल्याने पर्यटन उद्योग संकटात आहे.तोरणमाळ, ता. धडगाव येथील विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ सुगीचा असतो. या काळात येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेटीही देतात. परंतु लाॅकडाऊननंतर येथील पर्यटन उद्योग हळूहळू पूर्वपदावर येत होता. यातून गेल्या आठवड्यापर्यंत गर्दी वाढत असल्याचे दिसून आले होते. दरम्यान, शुक्रवारपासून ढगाळ वातावरण व पाऊस यामुळे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस फिरण्यासाठी येणाऱ्यांची संख्या पुन्हा कमी झाली आहे. दोन दिवसात पाऊस झाल्याने याठिकाणी पर्यटकांची वर्दळ कमी झाली होती. येत्या काही दिवसात याठिकाणी तापमान कमी होणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यातून पर्यटक तोरणमाळकडे पुन्हा वळू लागतील, असा अंदाज आहे.
ऐन हंगामात पर्यटकांअभावी तोरणमाळला शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 12:30 IST