शहरातील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यात वाहनांची संख्याही अधिक आहे. अशाही परिस्थितीत अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावरही दुचाकीस्वार एका हाताने गाडी चालवत दुसऱ्या हातात मोबाइल घेऊन बोलतात. त्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. अशा दुचाकीस्वारांविरोधात शहर वाहतूक शाखेने मोहीमच सुरू केली आहे. शहरातील प्रत्येक पॉइंटवर उभे असलेले वाहतूक शाखेचे कर्मचारी अशा दुचाकीस्वारांवर लक्ष ठेवतात. दुचाकी चालविताना मोबाइलवर बोलत असल्यास लगेच ई-चालान फाडण्यात येते. त्याबाबतचा मेसेज संबंधित दुचाकी मालकाच्या मोबाइलवर जातो.
त्यानंतर त्या दुचाकीस्वाराला दंडाची रक्कम भरावीच लागते. नांदेड शहरात गेल्या वर्षभरात अशा तब्बल १० हजार ५०० दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे;
परंतु दंड आकारणीनंतर हम नही सुधरेंगे अशाच अविर्भावात अनेक दुचाकीस्वार आहेत. त्याचा त्रास मात्र इतर वाहनधारकांना होतो.