आसना ते वारंगा रस्त्यावरील खड्डे आणखी किती बळी घेणार, हे खड्डे बुजविण्याकरिता कोणता दिवस उजडणार, असे अनेक प्रश्न नागरिकांना व प्रवाशांना पडले होते.
आसना-अर्धापूर-पार्डी-वारंगा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. बातमीच्या माध्यमातून याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर या आसना-अर्धापूर-पार्डी-वारंगा या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे; मात्र मोठमोठे खड्डेच बुजविण्यात येत आहेत. लहान खड्डे सोडून दिले जात आहे. या रस्त्यावरील वर्दळ पाहता लहान व मोठे खड्डेही बुजविण्यात यावे. या रस्त्यावरील वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने लहान खड्डेही काही दिवसानंतर मोठे होतील आणि आणखी अपघात वाढतील, असे नागरिक आणि प्रवाशांचे म्हणणे आहे. खड्डे बुजविताना लहान व लेव्हल काढणे आवश्यकता आहे. लेव्हल काढली नाही तर बुजविलेला खड्डा वाहनांच्या रहदारीने मोठा होऊन पुन्हा मोठा खड्डा तयार होईल आणि अपघात वाढेल. याकरिता शासनाने याकडे लक्ष द्यावे.