बिलोली : सर्वत्र नगरपालिका क्षेत्रात रात्री ११ वाजतापासून सकाळी ६ वाजतापर्यंत पूर्णतः संचारबंदी घोषित करण्यात आली. त्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरेंट, ढाबे, दुकाने, बाजार, मंगल कार्यालय यासह अन्य गर्दीची प्रतिष्ठाने १०.३० नंतर सुरू ठेवता येणार नाही. नववर्षाच्या निमित्ताने तेलंगणा राज्यातून येणारी अवैध दारू, ग्रामीण शहरी भागात होणाऱ्या जल्लोष, पार्ट्यांवर खाकी वर्दीची करडी नजर राहणार आहे. यात नियम मोडणा-यांवर गंभीर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिध्देश्वर धुमाळ यांनी दिली आहे.
नववर्षाला रात्री उशिरापर्यंत संगीत पार्ट्या करता येणार नाहीत, यासह ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू असून नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करत नवीन वर्षाचे स्वागत करावे, दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी उशिरापर्यंत फटाके वाजवून डीजेच्या तालावर बेधुंदपणे नाचत नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येते. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मर्यादा आल्या असून ३१ डिसेंबर रोजी निर्बंधित कालावधीत नागरिकांची वर्दळ, गर्दी राहणार नाही. ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूक असून या काळात दारूची विक्री अथवा वाटप होत असल्यास पोलीस प्रशासनास त्वरित कळविण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिध्देश्वर धुमाळ यांनी केले आहे. ग्रामीण भागात निवडणुकीच्या काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक शिवाजी अण्णा डोईफोडे, सपोनि रामदास केंद्रे यांच्या पथकांकडून दररोज गस्त घातली जात आहे.