माहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येत असून आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे २३ डिसेंबर २०२० ते ३० डिसेंबर २०२० असा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी आहे. सार्वजनिक सुटी वगळता या कालावधीत वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा वेळ ठरवून दिला आहे. मात्र, नामनिर्देशनपत्र दाखल करताना २८ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळपासून काही तांत्रिक अडचणी जसे इंटरनेटची गती कमी, सर्व्हर अडचण इत्यादी तक्रारी आयोगाकडे प्राप्त होत आहेत. सदर बाबींचा विचार करून इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्रापासून वंचित राहू नये आणि त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून आयोगाने उमेदवारी अर्ज पारंपरिक पद्धतीने (ऑफलाइन) स्वीकारण्याचा व अर्ज दाखल करण्याची वेळ ३० डिसेंबर रोजी सायंकाळी पाच तीस वाजेपर्यंत वाढविली असल्याची माहिती २९ डिसेंबर रोजी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आयोगाने कळविले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०२० आहे.
ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत आयोगाने वाढ केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:24 IST